प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील इतर सर्व मंदिरे कोरोनाचे नियम पाळून पूर्ण क्षमतेने खुली झाली असताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची प्रमुख मंदिरे असणारी अंबाबाई व जोतिबा मंदिर येथे भक्तांना दर्शनासाठी ई पासची अद्यापही सक्ती केली आहे. प्रशासनाच्या या आडमुठे निर्णयाविरोधात भाजपने बुधवारी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी लागू केलेली ई पासची सक्ती रद्द करावी आणि सर्व भाविकांना मुक्तपणे देवीचे दर्शन घेता यावे या मागणीसाठी महाद्वार चौक येथे अंबामातेचा जागर घालून मंदिराचे दार उघडण्यासाठी देवीला साकडे घातले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी अंबामातेचा जागर करून मंदिराचे दार खुले करण्यासाठी साद घातली.
जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, कोरोनाचे संकट कमी झाल्यांनतर भाजपच्या मागणीमुळे राज्यातील सर्व मंदिरे खुली केली. परंतु कोल्हापूरमधील जगप्रसिद्ध अंबाबाई मंदिर मात्र या प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे अद्याप ई पासची सक्ती करून, एक दरवाजा खुला करून सुरु आहे. यामुळे स्थानिक भाविकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाची यामागची भूमिका काय असा सवाल निर्माण झाला आहे. मंदिरावर उपजीविका करणाऱया अनेक घटकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जागर आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी देऊन चुकीच्या पद्धतीने सुरु असलेले प्रशासनाचे कार्य बंद करून सर्वसामान्य लोकांसाठी प्रशासनाचा उपयोग होऊ दे यासाठी आजचा जागर आहे. या आंदोलनानंतर प्रशासनाने ई पास व दरवाजे उघडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर उग्र आंदोलन करून मंदिराचे दारे खुली केली जातील, असा इशाराही चिकोडे यांनी दिला. कार्यक्रमाची सांगता देवीची आरती करून करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई, दिलीप मेत्रानी, हेमंत यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.