पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांची माहिती, सीईटीनंतरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया
प्रतिनिधी / कोल्हापूर
दहावीच्या निकालानंतर अकरावी, आयटीआय आणि पॉलिटेक्नीक यासह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची घाई सुरु होते. यंदा मात्र आयटीआय आणि पॉलिटेक्नीक यासह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. परंतू अकरावी प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी 100 गुणांची सीईटी झाल्यानंतरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा गुणांची खिरापतच वाटल्याने यंदा गुणांचा फुगवटा अधिकच वाढला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल 97.64 टक्के होता. तर यंदा 99.92 आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल 3 टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी 133917 विद्यार्थ्यांपैकी 130751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 3 हजार 166 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यंदा 134939 पैकी 134833 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 106 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचे स्पष्ट होते. तरीही विद्यार्थी अकरावी, आयटीआय आणि पॉलिटेक्नीक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. त्यामुळे अकरावीला प्रवेशाची संख्या वाढली तरी तुकड्या वाढवण्याची गरज भासणार नाही कारण गतवर्षी अकरावीच्या 14680 जागांपैकी दोन फेऱयांमध्ये 12691 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. 1989 जागा शिल्लक होत्या. त्यामुळे तुकड्या न वाढवता आहे त्या तुकड्यांमध्ये वाढीव विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. कारण बहुतांश विद्यार्थ्यांचा आयटीआय, पॉलिटेक्नीकला प्रवेश घेण्याकडे ओढा आहे.
अकरावी माध्यमानुसार विद्यार्थी क्षमता
कला इंग्रजी : 120
कला मराठी : 3600
वाणिज्य इंग्रजी : 1600
वाणिज्य मराठी : 3360
विज्ञान : 6000
एकूण : 14680
शासकीय तंत्रनिकेतन
सिव्हील इंजिनिअरिंग : 173
मेकॅनिकल इंजिनिअरिंग : 207
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग : 69
इलेक्ट्रॉनिक ऍन्ड टेलीकम्युनिकेशन : 138
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी : 69
धातूशास्त्र :46
अपंग कोटा : 20
एकूण : 702
आयटीआय
30 अभ्यासक्रम जागा : 1412
सीईटी केंद्रीय पध्दतीने
अकरावी प्रवेशासंदर्भातील 100 गुणांची सीईटी केंद्रीय पध्दतीने घेण्यात येणार आहे. परंतू प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा सेंटर देण्यात येणार आहे. सध्या सीईटीचे नियोजन सुरू आहे. नियोजन झाल्यानंतर शिक्षण सहसंचालक कार्यालयामार्फत सीईटीसंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल – दिनकर पाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे )
अकरावीच्या तुकड्या वाढवण्याची आवश्यकता नाही
अकरावी प्रवेश प्रक्रिया सीईटी झाल्यानंतरच राबवली जाणार आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही. गतवर्षी अकरावीच्या 70 टक्के जागेवर प्रवेश घेतला होता. तर 30 टक्के जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळं यंदा तुकड्या वाढवण्याची गरज नाही. आहे त्या तुकड्यांमध्ये जागा वाढवून दिल्या जातील. सुभाष चौगुले (सहाय्यक शिक्षण संचालक, कोल्हापूर)