पदवीपूर्व शिक्षण खात्याचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना उत्तीर्ण करून बारावीत प्रवेश देण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली होती. मात्र, आता हा निर्णय रद्द करून पदवीपूर्व महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याचा आदेश पदवीपूर्व शिक्षण खात्याने दिला आहे. यासंबंधीचे पत्रक 8 जून रोजीच जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता या विद्यार्थ्यांसाठी सक्तीने ऑनलाईन परीक्षा घ्यावी, असा आदेश जारी करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वीच महाविद्यालयांना यासंबंधी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, याविषयी वेगवेगळय़ा प्रतिक्रिया उमटू लागल्याने शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर प्रश्नपत्रिका अपलोड केल्या असून प्रत्येक विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवाव्या लागणार आहेत. या प्रश्नपत्रिकांना असाईन्मेंट 1, असाईन्मेंट 2 असे संबोधण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका सोडवून संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना व्हॉट्स ऍप, ई-मेल किंवा पोस्टाने पाठवावे, अशी सूचना करण्यात आली आहे. ही परीक्षा महाविद्यालयांमध्ये न घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पाठवून दिलेल्या असाईन्मेंटचे मूल्यमापन करून हा निकाल स्टुडेंट ऍचिव्हमेंट ट्रकींग सिस्टम (SATS) वर अपलोड करावा लागणार आहे.
पहिली असाईन्मेंट विद्यार्थ्यांना 20 जूनपर्यंत पाठवावी लागणार असून प्राध्यापकांनी त्याचे 25 जूनपूर्वी मूल्यमापन करावे. त्याचप्रमाणे दुसरी असाईन्मेंट 26 जूनपूर्वी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना पाठवून द्यावी. त्याचे मूल्यमापन 5 जुलैपूर्वी करावे लागणार आहे. प्राध्यापकांनी दोन्ही असाईन्मेंटमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुणांचे एकत्रिकरण करून संपूर्ण निकाल 20 जुलैपूर्वी SATS वर अपलोड करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयासाठी आधीच 35 गुण मिळणार आहेत. दोन्ही असाईन्मेंटना प्रत्येकी 30 याप्रमाणे 60 गुण निर्धारित करण्यात आले आहेत. तर अंतर्गत 5 गुण असतील. अशा प्रकारे प्रत्येक विषयासाठी 100 गुणांचे समीकरण असणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त
बारावीत प्रवेश घेतल्यानंतर विविध खाते, संस्थांकडून देण्यात येणाऱया शिष्यवृत्तीसाठी अकरावीत मिळालेले गुण गृहीत धरले जातात. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययानातील सातत्यता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने मूल्यमापन ही औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.