प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेमुळे पदवीपूर्व प्रथम वर्षांचा निकाल परीक्षेनंतर तब्बल दोन महिन्यांनी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे निकालानुसार विद्यार्थ्यांनी बारावीत प्रवेश केला आहे. 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील अकरावीचे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाले असून सदर परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन स्तरावर पुनर्परीक्षा घेऊन पदवीपूर्व द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. पुनर्परीक्षेचा निर्णय 17 मे च्या लॉकडाऊननंतर होण्याची शक्मयता असल्याचे पदवीपूर्व खात्याने सांगितले आहे. यामुळे पदवीपूर्वचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी कोविड-19 मुळे महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणारी बारावीची (पदवीपूर्वचा अंतिम टप्पा) व्हॅकेशन बॅच लॉकडाऊनमध्ये अडकली आहे.
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे पूर्व प्राथमिकपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या परीक्षा व प्रवेशाचा मुद्दा अडकून पडला. मात्र पदवीपूर्व प्रथम वर्ष अर्थात अकरावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान सुरळीतपणे पार पडली. मात्र निकालाची तारीख लांबणीवर पडली होती. अखेर पदवीपूर्व खात्याने व्हॉटस् ऍप तसेच वेबसाईटच्या माध्यमातून निकालाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याबाबत 17 मे नंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. दरवर्षी प्राचार्य असोसिएशनच्यावतीने प्रश्नपत्रिका तयार करण्यात येतात. मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन स्तरावरच प्रश्नपत्रिका तयार करून पुनर्परीक्षा घेण्याबाबतचा विचार असून परिस्थिती सुधारल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.