आखवणेच्या बुडित क्षेत्रात होते मंदिर : पाण्याच्या विसर्गानंतर मंदिराचे दर्शन : गाव हद्दीत मूर्तींची ताप्तुरती प्रतिष्ठापना
प्रतिनिधी / वैभववाडी:
अरुणा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात पाण्याखाली गेलेले आखवणे गावचे ग्रामदैवत श्री देवी धाकुबाई मंदिरातील देवतांच्या मूर्ती तब्बल अकरा महिन्यानंतर पाण्याबाहेर आणण्यात आल्या. मंगळवारी ग्रामस्थांनी सामाजिक अंतर राखून या देवतांची विधीवत पूजा केली. या देवतांच्या मूर्तींची आखवणे गावच्या हद्दीत आखवणे ‘सुरुंग व्हाळ’ याठिकाणी तात्पुरती स्थापना करण्यात आली.
अरुणा धरणाच्या बुडित क्षेत्रात आखवणे व भोम ही दोन गावे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे गावाबरोबरच दोन्ही गावातील ग्रामदेवतांची मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत. गतवर्षी शासनाने तातडीने घळभरणी केल्यामुळे आखवणे गावचे ग्रामदैवत असलेले श्री देवी धाकुबाई मंदिर धरणाच्या पाण्यात बुडाले होते. शासनाने घळभरणीचे काम घाई गडबडीत हाती घेतल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांची घरेही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे काही ग्रामस्थांच्या मौल्यवान वस्तू, घरातील देवता या पाण्याखाली गेल्या. यावर प्रकल्पग्रस्तांनी अनेक वेळा आंदोलने केली होती. मात्र, प्रशासन या बाबी मान्य करायला तयार नव्हते. कडकडीत उन्हाळा आणि धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे तब्बल अकरा महिन्यानंतर पाण्याखाली बुडालेल्या मंदिराचे दर्शन झाले. मात्र, मंदिराभोवती पाण्याचा वेढा कायम होता. अजून पाण्याचा विसर्ग झाला असता तर प्रकल्पग्रस्तांची घरे व त्यात पाण्याखाली गेलेल्या वस्तू मिळाल्या असत्या.
मंदिरात जाण्यासाठी प्लास्टिक बॅरलची तराफ
दरम्यान, मंदिर दिसू लागल्याने ग्रामस्थांनी मंदिरातील मूर्ती बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी गेले पाच-सहा दिवस ग्रामस्थ मेहनत घेत होते. पाण्यातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिकामी प्लास्टिक बॅरलची तराफ तयार करण्यात आला. यावरून चार-चार माणसांना मंदिरात सोडण्यात आले. त्यानंतर एक-एक करून सर्व मूर्ती पाण्याबाहेर काढण्यात आल्या.
आखवणेत लवकरच देवीचे भव्य मंदिर
सोमवारी विधीवत मंदिरातील देवांचे कलशाकरण करून अस्तित्व उतरवून देवालयातील सर्व मोठी पाषाणे बाहेर काढण्यात आली. यावेळी ब्राह्मण विधी, होमहवन, यज्ञ असे धार्मिक विधी सोशल डिस्टन्स राखून करण्यात आले. यज्ञ होम विश्वनाथ नागप, ज्ञानेश्वर नागप, संतोष नागप, प्रभाकर शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. तर विधीवत पूजाअर्चा गाऱहाणी करून देवतांची सर्व पाषाणे व इतर सामान सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने देवस्थानचे मानकरी अंकुश परशुराम नागप यांच्या आखवणे ‘सुरुंग व्हाळ’ येथील जागेत तात्पुरते स्थापन करण्यात आले आहे. लवकरच येथे देवीचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी अंकुश नागप, जगन्नाथ नागप, आकाराम नागप, कृष्णा नागप, महादेव नागप, मनोहर नागप, अनंत नागप, भाई शेलार, पोलीस पाटील संतोष गुरव, शांतीनाथ गुरव, लक्ष्मण ढवण, उदय नागप, सुरेश पांचाळ, गणपत पडिलकर आदी ग्रामस्थ सोशल डिस्टन्स राखून उपस्थित होते.