अध्याय दहावा
विधिवत केलेली सकाम कृत्ये मनुष्याला स्वर्ग मिळवून देतात पण शेवटी त्यांचा परिणाम दुःखदायकच ठरतो हे उद्धवाला भगवंतांनी पटवून दिले. पुढे सांगतात की, काही लोकांना विधिवत कृत्ये करण्यापेक्षा अविधी कृत्ये करून लवकर सुख मिळेल असे वाटत असते. त्याबद्दल मी तुला सविस्तर सांगतो. विधिनुसार जी कर्मे होत नाहीत त्यांना अविधी कृत्ये असे म्हणतात. अविधी कृत्ये करणारे दुर्मती लोक वेदविधींचे उल्लंघन करून कुत्सित लोकांच्या संगतीने चुकीचा मार्ग धरतात आणि अधर्म माजवतात. जीव स्वभावतःच कामासक्त असतो, त्यामुळे त्यास इच्छिलेले विषय प्राप्त झाले की ते व्यभिचारी होतात. जर इच्छित वस्तु प्राप्त झाली नाही तर त्यांचे मन व्याकुळ होऊन जाते. अशा व्यभिचारी स्वभावाच्या मनुष्याला जर दुष्ट पुरुषाचा सहवास घडला, तर त्याची अधर्मावरच श्रद्धा बसते आणि तो अकर्माला प्रवृत्त होतो. चंचलपणामुळे विवेकाला थारा असत नाही. त्यामुळे तो कामशास्त्राच्याच मागे लागतो. कामशास्त्राच्या नादामुळे त्याची वासना वाढते आणि त्या वासनेमुळे अधर्म बळावतो. अधर्मामुळे अकर्म आरंभून निंद्य कर्माचे आचरण तो करतो. निंद्य कर्माच्या प्रवृत्तीचे मूळ भोगाची लालूच हे आहे. भोगाच्या लालचीमुळेच अधर्माचा यथास्थित फैलाव होतो. अधर्म वाढला की परद्रव्य आणि परस्त्री यासाठी नानाप्रकारच्या युक्त्याप्रयुक्त्या लढवून त्या कामी शरीराला झिजवतो. स्त्रीसाठी अगदी काकुळतीला येतो. स्त्रीच्या ध्यासाने स्त्रwण बनतो आणि ती स्त्री मिळविण्याकरिता प्राण्याची हिंसा करण्यासही सुरुवात करतो. विधि सांगत असेल ते करायचे नाही वेद काय म्हणतो ते ऐकायचे नाही, स्मृतिशास्त्र मनाला पटावयाचे नाही आणि स्वेच्छेनेच कर्म करायचे असा त्याचा खाक्मया असतो. जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, वशीकरण इत्यादी प्रयोग करून असाध्य असलेलेही साध्य करून स्त्रियांच्या मागे लागायचे! लोण, मोहरी, बिब्बे हे सारे मधात कालवून शाबरी मंत्राच्या प्रभावाने होम करायच्या मागे तामसी पुरुष धावतो. जारणमारणादि कर्म करण्याकरिता बकरी, कोल्ही, वानर, सरडे, बेडूक, मासे, मगर, गिधाड व घारी यांचा सुद्धा होम करतात. नग्न भैरव, वेताळ, झोटिंग, पिशाच, कंकाळ, मारको, मेसको, मैराळ इत्यादि प्रबळ भूतांची उपासना करतात. देवालयातील देवापुढे जमलेले किंवा शिवालयात शिवापुढे ठेवलेले द्रव्य अथवा पदार्थ सर्रास उचलून घेतात! इतकी त्यांची अधर्मातील वासना अचाट असते. तात्पर्य, अशा रीतीने कर्म करताना त्या अकर्माच्या योगाने चंद्र जसा अमावास्येला गर्द अंधारात बुडून जातो त्याप्रमाणे तोही नरकात शिरतो. कारण अकर्म हे मोठे प्रबळ आहे. ते जीवाच्या ज्ञानाचा नाश करते आणि त्याच वेळी त्याला अत्यंत मूढ बनवून नरकाच्या खळाळात घालते. अशाप्रकारे कर्मभोगाचा अंत होईपर्यंत म्हणजेच दीर्घकाळपर्यंत तो नरकात खितपत पडतो. तिथले भोग संपल्यावर त्याला स्थावर अवस्था प्राप्त होते. म्हणजे तो वृक्ष किंवा पाषाण होतो. तात्पर्य, अधर्मप्रवृत्तीने वागले असता सुखाचा लेशही प्राप्त होत नाही. अनिवार दुःखातून त्याची सुटका होत नाही. उद्धवा, जीव हा मरणधर्माला पात्र आहे. त्याच्या वाटय़ाला सुख म्हणून कधी येत नाही. दुःखद स्थितीतच त्याचे नेहमी वास्तव्य असते. नरदेहाला येऊन मोठमोठी निर्दयीपणाची कृत्ये करतो, त्यामुळे त्याला उत्तरोत्तर दुःखाचीच फळे मिळतात व ती त्याला मोठय़ा यातना भोगायला लावतात. जे संतचरणांना विमुख होतात, त्यांना स्वप्नातही सुख मिळायचे नाही. कामुक लोक हे क्रूर कर्मेच करीत असल्यामुळे त्यांचे दुःख वाढतच असते. थोडक्मयात सांगायचे तर सकाम कर्मे विधिपूर्वक करा किंवा अविधिपूर्वक करा त्यातून सदासर्वदा अनिवार असे दुःखच भोगावे लागते. सकाम कर्मे विधिपूर्वक केली तरी पुण्यसंचय संपल्यावर स्वर्गातून पतन होते आणि अविधीने केली तर भयंकर नरक प्राप्त होतो. एकूण सकाम कर्म करणाऱया मनुष्याला सुख मिळत नाही ते नाहीच कारण त्याची समजूत आणि विचार करण्याची दिशाच चुकीची असते.
क्रमशः