ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली.
- अमरावतीमध्ये मुंबईपेक्षा अधिक रुग्ण
पवार म्हणाले, 1 फेब्रुवारीपासून रुग्ण संख्या वाढत आहे. अमरावतीमध्ये रुग्ण संख्या अधिक आहे. मुंबई पेक्षा जास्त रुग्ण वाढ अमरावतीमध्ये दिसत आहे. लोक मास्क लावत नाही त्यामुळे जिल्हाभर लॉकडाऊन करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
फक्त शहरांमध्ये की ग्रामीण भागातही लॉकडाऊन लावायचा यावर देखील विचार सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- संजय राठोड गायब झालेले नाहीत
संजय राठोड यांच्या बद्दल बोलताना अजित पवार यांनी ते गायब नसल्याचा पुनरुच्चार आज केला. ते म्हणाले, यवतमाळच्या कोरोना स्थितीबाबत संजय राठोड यांच्याशी आजच माझे बोलणे झाले आहे.
विधानसभाध्यक्ष निवडीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, विधानसभा पद जास्त काळ रिक्त ठेवून चालणार नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये विधानसभाध्यक्ष पदाविषयी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.