आजचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा
प्रतिनिधी / अक्कलकोट
गुरूंचे गुरु सद्गुरूंचे गुरु ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्री स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थाना गुरु मानणारे असंख्य स्वामी भक्त आहेत. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजरी होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
यंदा कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे दि. १७ मार्चपासून येथील वटवृक्ष मंदिर भक्तांना दर्शनाकरिता आजमितीपर्यंत बंदच आहे. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा, धार्मिक विधी हे नियमितपणे चालू आहेत. कोरोनाचा देश विदेशासह अक्कलकोटमधील वाढता संसर्ग पाहता यंदा वटवृक्ष मंदिरातील आजचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पहाटे पाच वाजता स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात व नंतर सकाळी १०वाजता गुरुपौर्णिमेची महानैवेद्य आरती मंदार पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले. आरतीनंतर मंदिर बंद करून गाभारा मंडपाचे प्रवेशद्वार त्वरित बंद करण्यात आले.
यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी यंदाच्या गुरुपौर्णिमेस कोरोनाच्या संकटामुळे गुरुशिष्यांच्या भेटीची परंपरा इतिहासात प्रथमच खंडित झाली असल्याचे सांगितले. या संकटातून स्वामींनी संपूर्ण जगास लवकरात लवकर मुक्त करावे याकरिता श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे सांगून स्वामी भक्तांनी देखील घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असे आवाहनही इंगळे यांनी याप्रसंगी केले.