कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवरती आजच्या दिवशी अक्षय तृतीया, रमझान ईद आणि परशुराम जयंती अशा सण-उत्सवांचा विलोभनीय असा झालेला त्रिवेणी संगम मानवी समाजासमोर उभे असलेले संकट निवारण करण्यास कारणीभूत ठरो. कोविड नियमांचे पालन, सामाजिक अंतर राखत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर त्याचप्रमाणे योग्यवेळी वैद्यकीय उपचार करून या संकटावरती मात करण्यात यश मिळविलेले असताना आपल्याकडे अक्षम्य बेजबाबदारपणाने हे संकट वृद्धिंगत होत आहे आणि यासाठी हे तिन्ही सण-उत्सव आपण मानवी मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी साजरे करण्याची नितांत गरज उद्भवलेली आहे. जगभरातल्या धर्म संस्कृतींनी सण-उत्सवांचे जे नियोजन केलेले आहे त्यामागे धार्मिक संस्कार, सौहार्दाची आणि सहकार्याची भावना वाढीस लावण्याबरोबर सत्य, शांती, प्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले होते. ग्रीष्म ऋतूचा कहर वाढत असताना वैशाखातल्या शुक्ल पक्षातली येणारी अक्षय तृतीया जीवनात अक्षय, सुख, समृद्धीचा वर्षाव करणारी म्हणून परमेश्वर पूजनाला प्राधान्य दिलेले आहे. पौराणिक काळात याच दिवशी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षयपात्र प्रदान केले होते. श्रीकृष्णाच्या भेटीस आलेल्या सुदाम्याला म्हणे याच दिवशी आवश्यक धनसंपत्तीचे दान केले होते. महात्मा बसवेश्वर जयंतीही आजच साजरी केली जाते. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून गेल्यास मानवाचे कल्याण निश्चितच आहे.
भगिरथाच्या तपोसाधनेमुळे गंगेचे आगमन भारत भूमीत होऊन तिला सुजलाम्, सुफलतेचा वारसा याच दिवशी लाभल्याचे मानले जाते. जैन धर्मातला पहिला तीर्थंकर ऋषभनाथानी प्रदीर्घ उपवासानंतर आजच्या दिवशी उसाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे जैन धर्मियात या दिवशी प्रार्थना झाल्यानंतर उसाच्या रसाबरोबर विशेष अन्नपदर्थांचे वाटप केले जाते. आपला देश कृषीप्रधान असल्याने येथील बऱयाच सण-उत्सवांची सांगड बदलत्या ऋतुशी घालण्यात आलेली आहे. भूमी ही सृजन आणि सर्जनाचे प्रतीक म्हणून वंदनीय मानलेली आहे आणि त्यामुळे ओडिसासारख्या राज्यात नांगरलेल्या शेतात खरीप पिकाची पेरणी अक्षय तृतीयेला करण्यास प्राधान्य दिले आहे. मोसमी पावसाच्या पाण्यावर देशातल्या खरीप पिकांचे भवितव्य अवलंबून असल्याकारणाने अशा शुभ मुहूर्तावरती भूमीच्या उदरात बियांची पेरणी झाली तर सुफलतेचे वरदान लाभेल आणि आपले जगणे सुखी होईल, अशी कष्टकरी समाजाची धारणा असते आणि त्यासाठी अक्षय तृतीयेच्या सणाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. खरेतर अक्षय तृतीयेच्या पर्वदिनीच पुरी येथील जगन्नाथ मंदिरातल्या रथोत्सवासाठी आवश्यक असणाऱया रथाच्या निर्मितीचा प्रारंभ केला जातो. अक्षय तृतीयेला दशावतारातल्या परशुरामाचा जन्म झाल्याने देशभरातल्या परशुरामाशी निगडित तीर्थक्षेत्री परशुराम जयंतीचा सोहळा भक्तिभावाने साजरा केला जातो.
या भृगु कुळातील जमदग्नी-रेणुका पुत्राचा जन्म नर्मदेच्या तीरावरती झाला. सहय़ाद्रीच्या उत्तर टोकावरती साल्हेरच्या डोंगरावर उभे राहून परशुरामाने बाण मारून समुद्र मागे हटवल्याची जशी कथा त्या प्रांतात रूढ आहे तशीच वदंता दक्षिणेत सहय़ाद्रीच्या अंतिम टोकाला केरळात तिरुवितांकुर जिल्हय़ात महेंद्रगिरी डोंगरावरती परशुरामाचे कायमचे वास्तव्य आहे. तेही परशुराम क्षेत्र म्हणून परिचित आहे. ओडिसातल्या महेंद्रगिरी पर्वतावर ते परशुराम क्षेत्र आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मिर, अरुणाचल प्रदेश, पंजाब आदी राज्यात परशुराम तीर्थक्षेत्रे असून दक्षिणेत आंध्र प्रदेशातही मंदिरे आहेत परंतु असे असले तरी केरळ आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी प्रदेशात परशुराम मंदिरांचे मोठे प्राबल्य आहे. कर्नाटकातल्या उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्हय़ात परशुरामाची मंदिरे नावारुपास आलेली आहेत. गोव्यातल्या भूमीत परशुरामाने बाण मारून सासष्टीतल्या बाणावलीपर्यंत समुद्राला मागे हटविले आणि मानवी वास्तव्याला आवश्यक भूमीची निर्मिती केल्याची कथा सहय़ाद्री खंडात आलेली आहे. अक्षय तृतीयेला परशुरामाचा जन्म झाल्याकारणाने हा दिवस देशाच्या विविध भागात जयंतीदिन म्हणून साजरा केला जात असतो. वसिष्ठी नदी किनाऱयावरच्या चिपळूणात डोंगरावर असलेल्या परशुराम मंदिरात प्रारंभी मूर्तीची स्थापना केली नव्हती. अठराव्या शतकात तेथे काम म्हणून ब्रह्मा, परशुराम म्हणून विष्णू व काल म्हणून शिव अशा तीन मूर्तींची स्थापना करण्यात आली.
जगभरातल्या इस्लाम धर्मियांसाठी रमजान ईदचा सण ही एक मोठी पर्वणी असते. इस्लाम या अरबी शब्दाचा अर्थ शांतीमध्ये प्रवेश करणे असा असून मानवमात्रावर प्रेम करणे व अहिंसा धर्माला इस्लामने महत्त्व दिले होते. प्रेषित महम्मद पैगंबराना समाधीस्थितीत धर्माचे दर्शन घडले आणि म्हणून त्यांना नबी, रसूल संज्ञा प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांनी अल्ला आणि मानव यांच्या धर्मदूताचे कार्य केले. इसवी सनाच्या पूर्वी सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात आगमन झालेल्या या प्रेषिताने श्रद्धा आणि आचरणावरती विशेष भर दिला. ईश्वर एक आहे व त्याचीच उपासना केली पाहिजे, हे कथन करण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी सांगितले आहे. इस्लाम धर्मात ईद सणाला महत्त्वाचे स्थान असून चांद्र कालगणनेनुसार रमजान महिन्यात फक्त संध्याकाळी सूर्यास्तानंतर भोजन करून उपवास पाळला जातो. याच पवित्र महिन्यात कुराण ग्रंथ पृथ्वीवरती अवतीर्ण झाल्याने भक्तिभावाने उपवासाचे पालन करून ईश्वराची प्रार्थना करण्याला प्राधान्य दिले जाते.
इस्लाम धर्माने कुराणात केवळ पारलौकिक गोष्टींचीच चर्चा न करता ऐहिक जीवनाविषयीचे प्रतिपादन केलेले आहे. व्याज घेणे पाप आहे. मद्यपान व द्यूत महापाप आहे. जो माणूस दुसऱयावर अन्याय करतो व धर्मात्मा म्हणून मिरवितो त्याला घोर यातना भोगाव्या लागतात, असे कुराण सांगते. प्रत्येक इस्लाम धर्मियाने आपल्या वार्षिक उत्पन्नाचा चाळिसावा हिस्सा दानधर्मात खर्च करण्याला कुराणाने प्राधान्य दिलेले आहे. यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात रमजान ईदचा सण आलेला आहे. एकमेकांना सदिच्छा व्यक्त करण्यासाठी भ्रमणध्वनीचा वापर करून घरच्या घरी नमाज पठण करण्याची गरज आहे. अक्षयतृतीया, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि ईद साजरी करताना गर्दी करण्याचे कटाक्षाने टाळून या सण उत्सवाचा आनंद वृद्धिंगत करण्यासाठी घरात राहून पंचपक्वान्नांचा आस्वाद घेण्यात आमचे हित दडलेले आहे. संपूर्ण जग आज कोविड-19 च्या संकटात भयाण मृत्यूच्या सावलीत वावरत असल्याने आम्ही एकमेकांच्या मदतीला जाण्याबरोबर नियमांच्या पालनांवर भर दिले तर या सणांचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल.