‘सतीचे ते घेता वाण’ हा संत तुकारामांचा अभंग कठीण कामे चिवटपणे पूर्ण करणाऱया वीजुगिषी वृत्तीविषयी आहे. कष्टाची तमा न बाळगता, ‘असिधारा’ व्रत जोपासणाऱया निश्चयाविषयी आहे. लिखाणाचे व्रत सतीच्या वाणासारखेच कठीण काम आहे. तशात ‘मौलिक’ लिहिणारी माणसे ही जर शीर्षस्थ प्रशासनामधील असतील तर त्याच्या कार्याला कुर्निसातच व्हावा. प्रशासनामधल्या माणसांच्या लिखाणाचे वाचकांना अप्रूप असते. निवृत्तीनंतर लिहिणाऱया प्रशासकांइतकाच किंबहुना जास्त आदर सेवेत असून अक्षरसेवा करणाऱया साहित्यिकांना लाभतो. उच्च शिक्षण क्षेत्रात चटकन डोळय़ापुढे येणारी नावेही अनेक आहेत. कुलगुरुपद भूषविलेल्या प्रो. शिवाजी सावंत, प्रो. द. ना. धनागरे, प्रो. नागनाथ कोत्तापल्ले, प्रो. पंडित विद्यासागर यासारख्या धुरीणांसोबतच वैज्ञानिक शास्त्रज्ञ प्रो. रघुनाथ माशेलकर, प्रो. जयंत नारळीकर आदि वैज्ञानिकांनी मराठी साहित्य समृद्धच केले आहे.
विद्यापीठ जगतात ‘कुलसचिव’ हे पद अनेक भाराने वाकलेले असते. शिक्षकी पिंड आणि सुसंवादी वृत्ती जिवंत ठेवून साहित्य सेवेत नियमितता असलेल्या प्रशासकांची संख्याही दुर्मिळ आहे. विद्यापीठ प्रशासनात हुद्याने आणि वृत्तीने प्राध्यापक असणारे प्रशासक हे अनेकदा अनिच्छेने, तडजोड म्हणून किंबहुना पुढील पदोन्नतीचा राजमार्ग म्हणून आलेले असतात. विद्यापीठ प्रशासन किंवा शैक्षणिक प्रशासन सृजनशील वृत्तीने, कल्पकतेने, संवादाने निर्मितीक्षम करता येते, या धारणेची माणसे तुलनेने कमी आढळतात. जीवनकेंद्री-विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोन, आस्वादक चिंतनशील वृत्ती आणि मानवतावादी धारणा असणाऱया डॉ. विलास नेताजी शिंदे या शिवाजी विद्यापीठातील प्रशासकाचे नुकतेच ‘आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे विज्ञानावरील तब्बल चारशे छत्तीस पानांचे पुस्तक, या पुस्तकाची प्रेरणा ठरलेल्या दोन विद्यार्थ्यांना प्रथम प्रत अर्पित करून अभिनवतेने ऑनलाईन प्रकाशित झाले आहे.
डॉ. शिंदे हे सोलापूरमधल्या बार्शी तालुक्मयातील चिंचोली गावचे. मराठवाडय़ाच्या सीमेवरील या गावात रझाकारांच्या काळात सुरक्षेसाठी सैनिकांचा पडाव असायचा. परिणामी चिंचोलीचे, ‘कॅम्प चिंचोली’ असेही नाव आहे. तालुक्मयाच्या गावी बारावी झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक्स विषय न मिळाल्यामुळे ते सोलापुरात दयानंद महाविद्यालयामध्ये आले (1986). या काळापर्यंत महाराष्ट्रातील महाविद्यालये प्राचार्यांच्या नावाने ओळखली जात असत. सोलापुरात के. भोगिशयन सर म्हणजे संगमेश्वर, जी. आर. शहा सर म्हणजे वालचंद आणि नंतरच्या काळात डॉ. नागेश धायगुडे म्हणजे दयानंद हे समीकरण होते. धायगुडे सरांच्या प्रभावामुळेच त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय घेऊन पदवी मिळवली. पुढे शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण आणि विद्यावाचस्पती पदवी मिळवली. सुरुवातीला बारामती आणि तदनंतर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र असणाऱया पदार्थ विज्ञानशास्त्र अधिविभागात ते अधिव्याख्याता राहिले. शिक्षकी पेशातील त्यांची घरातील चौथी पिढी आहे. पुढील प्रवास प्रशासकीय कारकिर्दीचा आणि लेखनाचा आहे. शिवाजी विद्यापीठात उप कुलसचिव ते प्रभारी कुलसचिव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दोन वर्षे कुलसचिव म्हणून त्यांची प्रशासकीय कामगिरी देदीप्यमान राहिलेली आहे. नांदेड विद्यापीठातील वृक्षारोपण आणि शिवाजी विद्यापीठातील जलसंधारण या त्यांच्या सांघिक कामांचे दृष्य परिणाम आपण पाहू शकतो. समर्पित भावनेने सुशासित प्रशासन देणारा हा माणूस माणसात, वाचनात आणि लिखाणात रमतो. अनेक प्रासंगिक संदर्भांचा धांडोळा घेत, ओघवत्या शैलीत, प्रसन्न आणि वाचनीय सामाजिक ललित निबंध प्रकारात डॉ. शिंदे अविरतपणे लिहित आहेत. डॉ. शिंदे सरांच्या ‘आवर्त सारणी’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील गोष्ट मोठी प्रेरक आहे. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संयुक्त राष्ट्र् संघाने 2019 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी’ वर्ष साजरे करण्याची घोषणा केली होती. या घटनेचे औचित्य साधून त्यांनी त्यांच्या स्तंभामध्ये ‘धन्यवाद मेंडेलिव’ नावाचा लेख लिहिला होता. हा लेख वाचून यश आंबोळे नावाच्या विद्यार्थ्याने सरांकडे विज्ञान दिनानिमित्त ‘आवर्त सारणी’ या विषयावर त्याच्या महाविद्यालयामध्ये व्याख्यान देण्याचा आग्रह धरला. सरांनी ‘रसायन शास्त्र’ हा माझा विषय नाही, असे सांगत हे आमंत्रण नाकारण्याचा प्रयत्न केला. अखेरीस विद्यार्थ्यांच्या उत्साहापुढे शरणागती पत्करत मोठय़ा तयारीनिशी मार्च महिन्यात त्यांनी व्याख्यान दिले. मार्च महिन्यात, दहावीची परीक्षा तोंडावर असताना म. गांधी विद्यालय, सरुड या शाळेची विद्यार्थिनी आर्या कोळेकर तिच्या आई-वडिलांसह या व्याख्यानाला उपस्थित होती. परीक्षा झाल्यानंतर तिच्या विज्ञान जिज्ञासेपोटी ती सरांना पुन्हा भेटली. हे दोन विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील शिक्षकांचे विज्ञान कुतूहल जाणवून सरांनी हे 118 मूलद्रव्यांवरील पुस्तक मराठीमध्ये करण्याचा निश्चय केला. हा लेखन संकल्प त्यांनी 2019 मध्येच पूर्ण केला. विज्ञान रंजक, सोपे आणि सहज लक्षात राहण्याजोगे करण्याचा त्यांचा प्रयत्न वाचताना लक्षात येतो. पूर्वाश्रमीचा पदार्थ विज्ञानाचा एक प्राध्यापक भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, कृषी शास्त्र, भूगर्भ शास्त्र आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये आपली प्रशासकीय कामे सांभाळून लीलयेने मुशाफिरी करीत असतो. हे विलोभनीय आहे आणि अनुकरणीय देखील आहे.
मराठी ही ज्ञान व्यवहार भाषा व्हावी असे अनेकांना वाटत असते. विज्ञानाचे सुलभीकरण होऊन त्यातील गूढता कमी व्हावी याबाबतही अनेकजण चिंता व्यक्त करीत असतात. यासाठी धोरणात्मक पाठिंबा आणि संस्थात्मक पाठबळाचीही आवश्यकता आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आलेल्या पुस्तकांना आणि संशोधन लेखांना विद्यापीठीय श्रेयांक पद्धतीमध्ये सन्मानाने आणि इंग्रजीच्या बरोबरीने पाहिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. व्यावहारिक गरजांपोटी मातृभाषांमध्ये ज्ञान व्यवहारांना आणण्याच्या प्रयत्नांना शिक्षक संशोधक स्वत:च दुय्यमत्व देतात. धोरणात्मक चौकटी आखणाऱयांनी आंतरराष्ट्रीय परिघ आणि प्रलोभन नाकारणाऱया डॉ. व्ही. एन. शिंदे सरांचे कष्ट आणि त्याग समजून घेण्याची आवश्यकता आहे.
डॉ. जगदीश जाधव