सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
बार्शी/प्रतिनिधी
स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरू करून सबंध देशाला आदर्श दिला, त्यांचेच नाव या योजनेला दिले आहे. अजून अनेक प्रश्न, अडचणी शिल्लक आहेत, हे प्रश्न आपापल्या गावात लोकसहभागातून सोडवा. लोकसहभागातून गावेच्या गावे समृद्ध करा, महाराष्ट्र आपोआपच स्वच्छ आणि समृद्ध बनेल, असे आवाहन करताना ग्रामविकासमंत्री यांनी सरपंच परिषदेच्या कामाचे कौतुक ही केले. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मिटींगमध्ये संवाद साधला. यावेळी गावगाडा चालवताना येणाऱ्या अडचणी पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.
या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना सांगितले की, तेरावा वित्त आयोग असेल अथवा चौदावा वित्त आयोग असेल, सरकारने विकास कामासाठी पाठवलेले पैसे तुम्ही वेळेवर का खर्च करत नाहीत असा सवाल पदाधिकाऱ्यांना या बैठकीत केला. राज्य सरकार दर महिन्याला नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन खर्च चालवीत आहे, याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. यावर मागील तीन वर्षे दुष्काळ, अतिवृष्टी व कोरोनाचे संकट यामुळे काही ग्रामपंचायत चा निधी खर्च होवू शकला नाही असे सरपंच परिषदेचे सरचिटणीस अँड विकास जाधव यांनी सांगितले. कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक कोंडीमुळेच तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व त्यावरील व्याज शासनाकडे घेण्याचा विषय चर्चेत आला त्यावेळी या पैशातून अर्सेनिक अल्बम सारखी औषधे जनतेला वाटण्याचा उद्देश सरकारचा होता. परंतु, तो खर्च न करता हे पैसे परत ग्रामपंचायतीला द्यावेत यासाठी प्रयत्न करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
एक हजार ५६७ ग्रामपंचायतींचा कार्यकाल ३० जून रोजी संपत आहे. त्यानंतर सप्टेंबरअखेर १२ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपणार आहे. आठवड्याभरातच बैठक घेऊन प्रशासक नेमणुकीचा ही विषय निकालात काढू असेही मंत्री महोदय यांनी सांगितले.मुंबईत सरपंच भवन बांधकाम, गावोगावच्या बांधकाम परवान्यांसाठी तांत्रिक व्यक्तीकडून तातडीने परवानगी आणि ग्रामपंचायतीचे काम करीत असताना सरपंचाला सुरक्षा याबाबत ही सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव, महिला अध्यक्ष राणीताई पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, जालना जिल्हाध्यक्ष माऊली वायल, शिवाजीआप्पा मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर माने, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, उदयसिंह चव्हाण, राजू पोतनीस, धनाजी खोत, संभाजी सरदेसाई, शिवाजी राऊत, संजय कांबळे, ॲड. दिग्विजय कुराडे, मारुती कोकितकर, संभाजी सरदेसाई, लक्ष्मण गुडूळकर, दीपक देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.
सरपंच परिषदेने केलेल्या मागण्या
● कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना विशेष आर्थिक मदत द्या
●ग्रामपंचायतीकडून जमा केलेल्या तेराव्या व चौदाव्या आयोगाच्या अखर्चित निधी सह व्याजाची रक्कम परत मिळावी
● संगणक परिचालक नियुक्तीचे अधिकार ग्रामपंचायतींना द्या
●मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचाचीच प्रशासक म्हणून नेमणूक करा
● ग्रामपंचायतीचे काम करताना सरपंचावर हल्ला झाल्यास आरोपीवर शासकीय अडथळ्याचे कलम घालून गुन्हा दाखल व्हावा
● नवी मुंबईत गावाच्या कामासाठी येणाऱ्या सरपंचासाठी सरपंच भवन उभारा
●पाणिपुरवठा व जि प शाळा यांच्या लाईट बिल कमर्शियल रेटने लावू नये