भाजपने बिगरयादव ओबीसी मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवून एक वेगळी मतपेढी तयार केली आहे. हीच मतपेढी भाजपला सत्ता मिळवून देण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले गेले. समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांनी आता याच फॉर्म्युल्यावर स्वतःचे नवे ‘सोशल इंजिनियरिंग’ तयार केले आहे. पारंपरिक दृष्टय़ा एमवाय (मुस्लीम-यादव) फॅक्टरसह अखिलेश यांनी बिगरयादव ओबीसी नेत्यांना मोठय़ा संख्येत तिकीट देत स्वतःच्या ओबीसी मतपेढीची व्याप्ती आणखीन मोठी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सपच्या दुसऱया यादीत 159 उमेदवारांपैकी 64 हे ओबीसी समुदायाशी संबंधित आहेत. यातील 15 यादव उमेदवार तर उर्वरित बिगरयादव ओबीसी उमेदवारांची संख्या 49 इतकी आहे. यातून अखिलेश यांनी बिगरयादव जातींना स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी मोठी खेळी केल्याचे मानले जात आहे. उत्तरप्रदेशच्या बिगर यादव ओबीसी लोकसंख्येत सर्वाधिक कुर्मी समुदायाचे प्रमाण असल्याचे मानले जाते. त्यांची संख्या सुमारे 8 टक्के इतकी आहे. अखिलेश यांनी यादव समुदायानंतर सर्वाधिक उमेदवारी कुर्मी समुदायालाच दिली आहे. या समुदायाच्या उमेदवारांची संख्या 12 आहे. याचबरोबर 5 मौर्य, 4 गडरिया आणि एक तिकीट लोधी समुदायाच्या नेत्याला मिळाले आहे.
जातीय जनगणनेची मागणी
अखिलेश यादव यांनी अनेकवेळा जातीय जनगणना करविण्याची मागणी केली आहे. ‘जितकी ज्याची हिस्सेदारी, तितकी त्याची भागीदारी’ असे त्यांचे म्हणणे आहे. या यादीत बिगरयादव ओबीसी उमेदवारांना देण्यात आलेले प्राधान्य त्याच्याशीच जोडून पाहिले जात आहे. जातींना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तिकीट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वैश्य समुदायालाही प्रतिनिधित्व
सर्वसाधारणपणे वैश्य समुदायाचा ओढा भाजपकडे असल्याचे मानले जाते. परंतु अखिलेश यांनी या समुदायालाही स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटी समवेत अन्य कारणांमुळे व्यापारी वर्ग, विशेषकरून छोटे आणि मध्यम व्यापारी नाराज असल्याचे अनेकदा म्हटले जात राहिले आहे. हेच पाहता अखिलेश यांनी वैश्य समुदायाला उमेदवारीत स्थान देऊन मोठी खेळी केली आहे. सपकडून वैश्य समुदायाच्या नेत्यांना 9 मतदारसंघांमध्ये उमेदवारी मिळाली आहे.
बिगरयादव ओबीसी नेत्यांचा पक्षप्रवेश
निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यावर उत्तरप्रदेशातील मंत्री आणि आमदार राहिलेल्या अनेक नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत सपमध्ये प्रवेश केला होता. राजीनामा देणाऱयांमध्ये प्रामुख्याने बिगरयादव ओबीसी नेते होते. एवढेच नाही तर मागील वर्षी लालजी वर्मा आणि आर.एस. कुशवाह यांनी बसप सोडून सपमध्ये प्रवेश केला होता. याचबरोबर राम अचल राजभर यांनी चालू वर्षाच्या प्रारंभी सायकलवर स्वार होण्याचा निर्णय घेतला होता. अखिलेश दीर्घकाळापासून या फॉर्म्युल्यावर काम करत असल्याचे यातून स्पष्ट होते.