राज्याची निवडणूक नजीक: मथुरा कृष्णभूमीचा मुद्दा तापला
वृत्तसंस्था/ मथुरा
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक नजीक येताच नेते भगवान भरोसे होऊ लागले आहेत. राम आणि राम मंदिराचा मुद्दा पूर्वीपासून चर्चेत असताना आता भगवान कृष्णाची एंट्री झाली आहे. माजी मुख्यमंत्री तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात येतात आणि उत्तरप्रदेशात सपचे सरकार येणार असल्याचे सांगतात असे विधान केले आहे.
भाजप रामराज्याबद्दल बोलत असला तरीही समाजवादाचा मार्गच रामराज्याचा आहे. ज्यादिवशी पूर्णपणे समाजवाद लागू होईल, त्या दिवसापासून रामराज्य सुरू होणार असल्याचे अखिलेश म्हणाले.
खासदाराकडून श्रीकृष्णाचा उल्लेख
राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ब्रज क्षेत्राच्या जनतेशी विशेष आत्मियता आहे. योगींनी भगवान श्रीकृष्णाची नगरी मथुरेतून निवडणूक लढवावी. स्वयं भगवान श्रीकृष्णांनी हे पत्र लिहिण्यासाठी प्रेरित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. अयोध्या, गोरखपूर किंवा मथुरेतून योगी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.
अखिलेश यादव लक्ष्य
अखिलेश यांना बाबर, जिन्नांपासून वेळ मिळाला आणि आता भगवान कृष्ण दिसू लागले, भले स्वप्नात का असेना. योगींची आणखीन 5 वर्षे पूर्ण होताच समाजवादी पक्षाला भगवान राम-कृष्ण आणि महादेव देखील दिसू लागतील अशी उपहासात्मक टीका राज्याचे मंत्री सिद्धार्थ नाथ यांनी केली आहे.
मथुरेसाठी योगी सज्ज
मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर निर्माण करण्याची मागणी जुनीच आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीस प्रारंभ झाल्याने श्रीकृष्ण जन्मभूमीसाठीचे प्रयत्न गतिमान झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका सभेत योगींनी अप्रत्यक्षपणे ‘मथुरेची तयारी’चा संकेत दिला आहे. ‘मोदींनी अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभारण्याचे कार्य सुरू केल्याने सर्व आनंदी आहेत. आता काशीमध्ये भगवान विश्वनाथाचे धाम देखील भव्य झाले असल्याने मथुरा-वृंदावन कसे मागे पडेल असे योगींनी म्हटले होते. तसेही हिंदुत्ववाद्यांकडून ‘अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है’ अशा घोषणा दिल्या जात असतात.
भाजपला काय होणार लाभ?
मथुरेतून योगींना निवडणुकीत उतरवून भाजप नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील उमेदवारीची पुनरावृत्ती करू पाहत आहे. योगींनी तेथून निवडणूक लढविण्यास जनतेत मोठा संदेश जाणार आहे. शेतकरी आंदोलनाच्या झटक्यातून सावरू पाहणाऱया भाजपला पश्चिम उत्तरप्रदेशची मोठी चिंता सतावत असावी. याचमुळे बाजप पश्चिम उत्तरप्रदेशची रणनीति मथुरा-वृंदावनमध्येच तयार करत आहे. समाजवादी पक्षाची सर्वात मोठी मतपेढी यादव समाज असून तो स्वतःला थेट श्रीकृष्णाशी जोडणारा आहे. यादव मतपेढी विखुरल्यास सपच्या अडचणी वाढणार आहेत.