जनरल बिपिन रावत यांना लष्कराकडून 17 तोफांची सलामी : कन्यांनी दिला मुखाग्नी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सलाम देण्यात आला आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही सेना दल प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी 800 लष्करी जवान उपस्थित होते. कृतिका आणि तारिणी या त्यांच्या मुलींनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी जनरल रावत यांच्या नातवानेही अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. याशिवाय नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकेच्या सैन्यदल प्रमुखांनीही उपस्थिती लावली. बिपिन रावत यांच्यापूर्वी बरार स्क्वायर स्मशानभूमीत ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. शुक्रवारी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचीही अंत्ययात्रा निघाली. याचदरम्यान तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्र्यांनी जनरल रावत यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. तसेच गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
जनरल रावत आणि त्यांची पत्नी यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या दिल्ली येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर त्यांचे नातेवाईक, मित्र, इतर सर्वांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कामराज मार्गावरील जनरल रावत यांच्या निवासस्थानापासून दुपारी 2.15 च्या सुमारास अखेरचा प्रवास सुरू झाला. दुपारी 3.35 वाजता पार्थिव बेरार चौकात पोहोचले. त्यानंतर पुढे स्मशानभूमीत नेण्यात आले. येथे सुमारे तासभर माजी लष्करी अधिकारी, लष्करी अधिकारी आणि इतर प्रमुख व्यक्तींनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर कृतिका आणि तारिणी या मुलींनी जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांना अग्नी दिला. जनरल रावत यांच्या कन्यांनी घेतलेली अखेरची भेट भावनिक होती. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. तत्पूर्वी सकाळी ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांनाही त्यांच्या मुलीनेच अग्नी दिला होता.
‘भारत माता की जय’च्या घोषणा
अंत्ययात्रेमध्ये ‘बिपिन रावत अमर रहे’चा सूर गुंजत राहिला. तसेच लोकांनी संपूर्ण मार्गावर फुलांचा वर्षाव केला आणि पार्थिवासोबत तिरंगा घेऊन धाव घेतली. अंत्यसंस्कारावेळीही आर्मी कॅन्टोनमेंट ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले. जनरल रावत यांना आदरांजली अर्पण करून त्यांचे पार्थिव लष्कराच्या गाडीतून बेरार चौकात आणण्यात आले. गन कॅरेजच्या पुढे आणि मागे तिन्ही दलांचे 99-99 सैनिक संचलन करत होते. त्याचवेळी हजारो लोक हातात तिरंगा घेऊन आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत आपल्या शूर योद्धय़ाला आदरांजली वाहत होते.
उच्चस्तरीय चौकशीच्या अहवालाची प्रतीक्षा करा, सत्य सर्वांसमोर येईल!
कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे ‘कट’ किंवा ‘घातपात’ असण्याची शक्मयता व्यक्त करणाऱयांना भारतीय हवाई दलाने कडक शब्दात सुनावले आहे. आम्ही या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. तपास वेगाने सुरू असून चौकशीअंतीच वस्तुस्थिती समोर येईल. तपासाची दिशा स्पष्ट होईपर्यंत अनावश्यक अटकळ व्यक्त करणे आणि भाष्य करणे टाळावे, असे आयएएफने ट्विटमध्ये म्हटले आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नसून तो काही कटाचा बळी असल्याची भीती व्यक्त करणाऱयाच्या अनुषंगाने हवाई दलाने हे आवाहन केले आहे.
चौकशी कोणाकडे, अहवाल कधी येणार?
हेलिकॉप्टर अपघाताची एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. सिंग हे भारतीय हवाई दलाच्या टेनिंग कमांडचे कमांडर आहेत. तसेच ते स्वतः हेलिकॉप्टर पायलटही आहेत. या तपास पथकात तिन्ही सेवांचे वरि÷ अधिकारी तसेच तांत्रिक पथकांचाही समावेश असेल. अपघाताच्या दिवशी म्हणजेच 8 डिसेंबरला तपास सुरू झाला होता. तपासाबाबत आयएएफने तारीख निश्चित केली नसली तरी तपासातून बिनचूक माहिती समोर येईल, असे स्पष्ट केले आहे.