उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात 55 टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.18 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱयांकडून देण्यात आली. या टप्प्यात राज्यातील उर्वरित 54 मतदारसंघात निवडणूक झाल्यानंतर आता पाच राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशातील अखेरच्या टप्प्यात एकंदर 613 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.
मिर्झापूर, आझमगढ, भदोही, चंदौली, गाझीपूर, जौनपूर, मऊ, सोनभद्र आणि वाराणसी अशा 9 जिल्हय़ांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. अखेरच्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार चंदौलीमध्ये 59.59 टक्के सर्वाधिक मतदान झाले होते. तसेच भदोहीमध्ये 54.26, आझमगडमध्ये 52.34, गाझिपूरमध्ये 53.67, जौनपूरमध्ये 53.55, मऊमध्ये 55.04, मिर्झापूरमध्ये 54.93, सोनभद्रमध्ये 56.95 आणि वाराणसीमध्ये 52.79 टक्के मतदानाची नोंद झाली होती. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. काही केंद्रांवर मतदानयंत्रात बिघाडाचे प्रकार घडले असले तरी अधिकारी-कर्मचाऱयांनी ते वेळीच सोडविल्यामुळे कोणत्याही ठिकाणी मोठी समस्या निर्माण झाली नाही.
या टप्प्यातील 54 मतदारसंघांपैकी चाकिया, रॉबर्ट्स्गंज आणि दुद्धी हे तीन नक्षलप्रभावित असल्याने तेथे अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सातव्या टप्प्यात अनेक मान्यवरांचे भवितव्य पणाला लागणार आहे. या उमेदवारांमध्ये राज्याचे पर्यटन मंत्री नीलकंठ तिवारी (वाराणसी दक्षिण), भाजप मित्रपक्षाचे नेते अनिल राजभर (शिवपूर), भाजप नेते रविंद्र जयस्वाल (वाराणसी उत्तर), सप नेते लकी यादव (मल्हानी), गिरीश यादव (जौनपूर), रामशंकर पटेल (मारीहान) इत्यादींचा समावेश आहे. बसपचेही काही नेते स्पर्धेत आहेत. मात्र, मुख्य संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पार्टी यांच्यात आहे.