आमची प्रचार मोहीम पूर्ण झाली आहे. अखेरच्या दोन टप्प्यांकडून आम्हाला फारशी अपेक्षा नसल्याचे पश्चिम बंगालमधील भाजपच्या एका मोठय़ा नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर म्हटले आहे. अखेरच्या दोन टप्प्यांमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे, त्यात मालदातील 12, मुर्शिदाबादमधील 20 आणि कोलकात्यातील 11 मतदारसंघ म्हणजेच भाजप सर्वात कमकुवत असलेल्या 45 जागांचा यात समावेश आहे.
या दोन्ही टप्प्यांमध्ये विशेषकरून मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसची लढत काँग्रेससोबत आहे. भाजपनेही या भागात जोर लावला आहे. पण स्थिती पाहता एखादी जागा मिळाली तरीही भाजपचे ते मोठे यश ठरणार आहे. मुर्शिदाबादमध्ये दोन उमेदवारांचे कोरोनामुळे निधन झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये 16 मे रोजी मतदान होणार आहे. म्हणजेच अखेरच्या दोन टप्प्यांमध्ये 71 ऐवजी 69 जागांवरच मतदान होणार आहे.
भाजपने मागील निवडणुकीत मालदा जिल्हय़ातील एका मतदारसंघात विजय मिळविला होता, पण तेव्हा काँग्रेसमधील गटबाजीचा लाभ मिळाला होता. पण यंदा काँग्रेसचे नेते अशी चूक करण्याच्या मनस्थितीत नाहीत. यंदा येथे भाजपचे अस्तित्व दिसून येणार नसल्याचे उद्गार मालदा जिल्हा काँग्रेसचे महासचिव मोहम्मद मसूद आलम यांनी काढले आहेत. मागील वेळेप्रमाणेच यंदाही आघाडी अंतर्गत जिल्हय़ातील 12 पैकी 9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर तीन ठिकाणी डाव्या पक्षांचे उमेदवार उभे राहिले आहेत. या सर्व जागा संयुक्त मोर्चाला मिळतील असा आलम यांचा दावा आहे.
दुसरीकडे मुर्शिदाबादच्या 20 मतदारसंघांमध्ये काँग्रेसच मजबूत दिसून येत आहे. हा प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांचा भाग असल्याने पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षानेही काही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पण जिल्हय़ातील बहुतांश मतदारसंघात संयुक्त मोर्चाचेच उमेदवार विजयी होतील असा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
या दोन्ही जिल्हय़ांमध्ये काँग्रेस अत्यंत बळकट असल्याने अनेक प्रयत्नानंतरही तृणमूल काँग्रेसला येथे एकाही जागेवर विजय मिळविता आलेला नाही. 10 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेसला येथे पाय रोवता आले नाहीत, तर मग भाजपला येथे कुठले स्थान मिळणार. भाजपला येथे लोकांचा पाठिंबा नाही तसेच संघटन देखील नाही असे स्थानिक काँग्रेस नेते मोहम्मद मंसूर यांनी म्हटले आहे.
यंदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला अनेक जागांवर यश मिळणार आहे. लोक काँग्रेसला कंटाळले असून जिल्हय़ाचा विकास ठप्प आहे. तृणमूलच भाजपच्या धोक्याला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचे लोक जाणून आहेत. याचमुळे लोक यंदा आम्हाला समर्थन देणार असल्याचा दावा तृणमूल नेत आणि लालदीघी मतदारसंघातील उमेदवार मोहम्मद अली यांनी केला आहे.
7 व्या टप्प्यात 34 मतदारसंघांकरता मतदान झाले असून यात दक्षिण दिनाजपूरमधील 6, पश्चिम वर्धमानमधील 9, मालदातील 6, मुर्शिदाबादमधील 9 आणि कोलकात्यातील 4 जागा सामील आहेत. बांगलादेशला लागून असलेल्या दक्षिण दिनाजपूरमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले होते. पण यंदा जिल्हय़ात त्याचे खाते उघडणार नसल्याचा तृणमूलचा दावा आहे. अशाप्रकारे कधीकाळी डाव्यांचा गड राहिलेल्या पश्चिम वर्धवानमध्ये आसनसोल आणि परिसर वगळताच उर्वरित भाग तृणमूलचा बालेकिल्ला ठरला आहे.
कोलकात्यातील 11 जागांवर मतदान झाले आहे. तर आठव्या आणि अखेरच्या टप्प्यात उर्वरित 7 मतदारसंघांकरता मतदान होणार आहे. या शहरी भागांमध्ये हिंदी भाषिकबहुल बडाबाजार भागाच्या व्यतिरिक्त भाजपचा फारसा प्रभाव नाही. हा भाग जोडासांको विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. तेथील लोकसंख्या संमिश्र आहे. तसेच अल्पसंख्याकांचेही लक्षणीय प्रमाण आहे. लोकसभेत हा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसलाच मिळाला होता.