रेल्वे प्रशासनाला आली जाग : ट्रकवर पेव्हर्स बसविण्यात आल्याने नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील चौथे रेल्वे गेट गेल्या सहा दिवसापासून चर्चेचा विषय बनला होता. कारण गेल्या सहा दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. पण दुरूस्तीचे काम तब्बल सहा दिवस अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना नागरिक तसेच वाहनचालकांना नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. गेल्या सहा दिवसापासून अनगोळ- उद्यमबाग चौथ्या रेल्वे गेटवर प्रचंड वाहतूक कोंडी पहावयास मिळत होती. तर या गेटच्या दोन्ही बाजुला लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या. गेट बंद झाल्यावर एका बाजुला रघुनाथ पेठ क्रॉसपर्यंत तर उद्यमबागच्या बाजुच्या नाल्यापर्यंत वाहनांच्या रांगा पहावयास मिळत होत्या.
या गेटवरून वाहतूक करताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. कारण रेल्वे रूळाचे दुरूस्तीचे काम अर्धवट सोडून दिल्यानंतर त्या रस्त्यावर मोठमोठी खडी तसेच मोठय़ा लाकडाच्या फळय़ा घालण्यात आल्या. पण या फळय़ा आणि मोठय़ा खडीमुळे वाहने सुरळीत जाण्यापेक्षा अडकून राहणे, रूतुन बसणे, वाहन चालवताना वाहने रस्ता सोडणे, खडीवरून घसरून पडणेच अधिक झाले होते. त्यामुळे वाहनचालकांचे आणि वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना चालत जाणे देखील मुश्कील झाले होते.
शनिवारी रात्री अडकली कार.. अन् काळजाचे ठोके वाढले
शनिवारी रात्री आठच्या सुमारास एक चारचाकी वाहन या ट्रकवरून जात होती. आणि या मोठय़ा खडीत ती अडकून राहिली. याचवेळी रेल्वे स्टेशनहून एक इंधन मालवाहतूक करणारी रेल्वे देसूरच्या दिशेने येत होती. आणि गेटमनने रेल्वे फाटक बंद करण्यास सुरुवात केली होती. पण त्या खडीत कार अडकल्याने सर्वांची तारांबळ उडाली. लगोलग तेथे उपस्थित नागरिकांनी वाहनातील नागरिकांना बाहेर काढून ती रूतुन बसलेली कार उचलून बाहेर काढली. तोपर्यंत रेल्वेला चौथ्या रेल्वे गेटचा सिग्नल मिळाला नसल्याने ती गाडी तिसऱया गेटपासून वेग कमी करत करत चौथ्या रेल्वे गेटच्या जवळ येऊन पोहचली होती. केवळ नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते वाहन बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर गेट बंद करून रेल्वेला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती. तसेच रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे चिड निर्माण झाली होती. पण सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. त्यामुळे सगळय़ांचा जीव भांडय़ात पडला. रविवारी सकाळपासूनच या रेल्वे ट्रकवर नवीन रूळ घालून दोन्ही बाजुला व्यवस्थित पेव्हर ब्लॉक घालून हा रस्ता पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
स्थानिक युवक-उद्यमबाग पोलिसांकडून मदत
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी तसेच अपघातांच्या मालिकांमुळे याठिकाणी आसपास असलेल्या दुकानचालकांना तसेच उद्यमबाग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱयांना याठिकाणी अडकलेली वाहने सुरक्षितपणे बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. घसरून पडलेली वाहने उचलणे, अडकलेली वाहने धक्का मारून उचलून बाजुला ठेवणे तसेच दोन्ही बाजुच्या रहदारीवर नियंत्रण ठेवून वाहतूक व्यवस्था मार्गी लावण्यासाठी कसरत करण्याची वेळ आली आहे.
रेल्वे विभागाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर : वाहने अडकण्याचे प्रकार
रेल्वे विभागाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. चौथे व तिसरे रेल्वेगेटजवळ ट्रकशेजारी टाकण्यात आलेल्या खडीमध्ये वाहने अडकू लागली आहेत. याचदरम्यान जर रेल्वे आल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे त्वरित या खडीवर पेव्हर्स बसविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
शनिवारी रात्री अनगोळ येथील चौथ्या रेल्वेगेटवर चारचाकी वाहन खडीत अडकून पडले. याच दरम्यान बेळगाव रेल्वे स्थानकातून रेल्वे खानापूरच्या दिशेने जाणार होती. तत्पूर्वी अडकलेली चारचाकी वाहन बाहेर काढण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु काही केल्या ही चारचाकी खडीतून बाहेर येत नव्हती. बराच प्रयत्न केल्यानंतर ती कार बाहेर काढण्यात आली. त्यामुळे काहीकाळ रेल्वे थांबविण्याची वेळ आली. असे प्रकार रात्रीच्या वेळी झाल्यास निष्पाप बळी जाऊ शकतात. याचा विचार करून रेल्वे विभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जात
आहे. मागील आठवडय़ात अनगोळ येथील चौथ्या रेल्वेगेटनजीक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ट्रकशेजारी असणारे पेव्हर्स काढून खडी टाकण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तिसऱया रेल्वेगेटचे काम करण्यात आले होते. परंतु तेथेही मोठी खडी टाकण्यात आली होती. वाहनचालकांना गेटच्या दुसऱया बाजूला जाण्यासाठी या खडीतून प्रवास करावा लागत आहे. यामुळे दुचाकी, चार चाकी वाहने यामध्ये अडकून पडत आहेत. अडकलेली वाहने ढकलून बाहेर काढण्याची वेळ येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पेव्हर्स बसविण्याची मागणी केली जात आहे.