नागरिकांच्या तक्रारींची दखल : दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ मुख्य रस्त्यावर लागलेल्या गळतीबाबत पाणीपुरवठा मंडळ आणि महापालिकेकडे सातत्याने तक्रार करण्यात आली होती. मात्र याची दुरुस्ती करण्यात आली होती. मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणावेळी लागलेल्या गळतीचे निवारण करण्यास अखेर वर्षानंतरचा मुहूर्त मिळाला आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अनगोळ मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वारावरच जलवाहिनीला गळती लागली होती. अनगोळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणावेळी गळतीचे निवारण करण्याचा प्रयत्न झाला होता.
मात्र याला यश आले नाही. काँक्रिटीकरणानंतर या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात होते. याबाबत महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. अनेकवेळा तक्रार करूनही पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले होते. अनगोळ परिसरात 24 तास पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या गळतीद्वारे 24 तास पाणी वाया जात होते. एकीकडे पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही. तर या ठिकाणी 24 तास पाणी वाया जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम एलऍण्डटी कंपनीने सुरू केले असून हे काम हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खंजर गल्ली कॉर्नर परिसरात देखील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी खोदाई करण्यात आली होती. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे व्हॉल्व्ह बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.