प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील कत्तलखान्यांमध्ये दररोज जनावरांची कत्तल होत असल्याने त्याद्वारे वाहणाऱया सांडपाण्यामुळे प्रदूषण निर्माण होत आहे. या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसविण्यात आला नसल्याच्या कारणावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाळे ठोकण्याची नोटीस बजावली होती. सर्वसाधारण बैठकीत या विषयाला बगल देऊन अखेर कत्तलखान्याला शनिवारी टाळे ठोकण्यात आले.
शहरात सुव्यवस्थित अत्याधुनिक पद्धतीचा कत्तलखाना उभारण्याचा प्रस्ताव बारगळला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्यावतीने चालविण्यात येणाऱया कत्तलखान्यामध्ये जनावरांची कत्तल करून मांस पुरवठा करण्यात येत होता. पण क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची कत्तल या ठिकाणी करण्यात येत असल्याने कत्तलखान्याद्वारे रक्तमिश्रीत सांडपाणी वाहत आहे. परिसरातील नाल्यामध्ये हे पाणी सोडण्यात आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. कत्तलखान्याच्या परिसरात मिलिटरी निवासी वसाहत असल्याने या ठिकाणी राहणाऱया नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. त्यामुळे कत्तलखान्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवून पाण्याचा निचरा करावा, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. त्यानुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. पण विविध कारणांमुळे हा प्रकल्प राबविण्यास विलंब झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने कंत्राटदाराने निविदेच्या रकमेत वाढ करून देण्याची मागणी केली होती. परिणामी हा प्रस्ताव बारगळला होता. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या कारणावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने 17 जून 2020 रोजी पुन्हा नोटीस बजावून कत्तलखाना बंद करण्याची सूचना केली होती. हा विषय गुरुवार दि. 25 रोजी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला होता. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसविण्यासाठी सदर्न कमांडकडे परवानगी मागितली असल्याचे सांगून या विषयावर कोणतीच चर्चा करण्यात आली नाही. मात्र, दुसऱयाच दिवशी कत्तलखान्यांना टाळे ठोकण्याची कारवाई कॅन्टोन्मेंट बोर्डने केली आहे.