गोडोली / प्रतिनिधी :
नव्याने काम सुरू असलेल्या गोडोली नाका ते राष्ट्रीय महामार्गपर्यंतचे काम घाईघाईने उरकू नका. आधी पुलाची कामे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा सहज प्रवाह होईल अशी गटाराची कामे पुर्ण करा. त्यानंतर रस्त्याचे गुणवत्तापूर्ण काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराला अँड. डि.जी.बनकर यांनी दिल्या.
दि.३ जानेवारीच्या ‘तरुण भारत’ अंकात बापट साहेब, तुम्हीच नारळ फोडा, या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून उठवलेल्या आवाजाने अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने सांडपाण्याची व्यवस्था करण्याच्यादृष्टीने काम करण्याची ग्वाही दिली.
सध्या राज्यभरात रस्त्यांची कामे सुसाट वेगाने सुरू असून निविदेच्या कालावधी ती कामे उरकण्याची घाई ठेकेदार करत आहेत. असाच प्रत्यय गोडोली नाका ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या कामाचा आला. गोडोली अर्ध्या गावाचे सांडपाणी खासुरूगी जागेत मुरतेय, त्याचा प्रवाह रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या गटारात होणार आहे. अजून हे सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे काम आधी करणे, क्रमप्राप्त असताना कामाच्या निविदेची मुदत कमी राहिल्याने थेट रस्त्याचे काम सुरू केले. हि बाब माजी उपनगराध्यक्ष अँड. डि.जी.बनकर यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी रस्त्याचे काम तत्काळ बंद करून आधी गटाराचे काम पुर्ण करून घ्या आणि नंतर रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशा सुचना दिल्या.
यावर अधिकाऱ्यांनी “गोडोली गाव, साईबाबा मंदिर परिसरातून येणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य उतार आणि रस्त्याचे काम याची प्रत्यक्ष पाहणी केली. लवकरच नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम समन्वयातून पुर्ण करेल, “अशी ग्वाही अभियंता सुहास इनामदार यांनी सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.