चिपळूण
फोफावलेल्या सावकारीने एकाचा बळी घेतल्यानंतर पैसे वसुलीसाठी एका तरुणीसह तिघांनी एका महिलेला मारहाण करुन मानसिक व शारीरिक त्रास केल्याप्रकरणी सावकारीच्या जाचाला कंटाळलेल्या या महिलेने येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांवर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.पूजा मिरगल, शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे उर्फ डिके (तिघेही चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याची जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी विशेष दखल घेतल्याची माहिती उपलब्ध झाली असून ते येत्या 2 दिवसांत येथे येण्याची शक्यता आहे.
या बाबतची फिर्याद बिलकीस अब्दुलकरीम परकार (भेंडीनाका) या महिलेने दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा मिरगल, शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे या तिघांनी परकार यांना 20 हजार रुपये कर्जाने दिले होते. त्यानंतर 5 हप्त्यात 15 हजार रुपये रक्कम व त्यावरील दंड म्हणून 10 हजार रुपये अशी रक्कम परकार यांनी दिली होती. मात्र तरीदेखील 1 लाख 200 रुपये देणे बाकी असल्याचे सांगून त्यासाठी मार्च ते 22 जून या कालावधीत जबरदस्तीने वेळोवेळी या तिघांनी मागणी करुन त्यांनी परकार यांना शिवीगाळ व दमदाटी करत ‘तू मेलीस तरी चालेल, परंतु आमच्याकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम व त्यावर झालेले व्याज आम्हाला द्यावेच लागेल’ असे धमकावून परकार यांना भोगाळे येथे असलेल्या डिके फायनान्स ऑफिसमध्ये बोलावून मारहाण केली. तसेच त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला. बेकायदेशीर रक्कम वसूल करण्याच्या उद्देशाने परकार यांना त्रास दिल्याने या प्रकरणी वरील तिघांवर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या वरील तिघांना अटक केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, सावकारीच्या जाचातून अभिजित गुरव याचा आत्महत्येचा प्रकार पुढे येताच अशा वाईट घटना जिह्यात होऊ नयेत, यासाठी अशा किडीला ठेचून काढण्याच्या सूचना उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना दिल्यानंतर याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग यांनी घेतली आहे. त्यानुसार येत्या 2 दिवसांत ते चिपळुणात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. सावकारीचा नायनाट व्हावा, यासाठी काही सामाजिक संस्था तसेच नागरिक पुढे येत असल्याने यातूनच या सावकारीने लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांची पिळवणूक केल्याची चर्चा ठिकठिकाणी रंगू लागली आहे. यातूनच सावकारीचा पूर्णतः नायनाट होण्यासाठी खऱया अर्थाने नागरिकांच्या तक्रारी पुढे येणे गरजेचे बनू लागले आहे.