दहावीची परीक्षा 21 मे पासून : बारावीचे उर्वरीत पेपर्स 20 पासून : दोन्ही परीक्षा घेण्यास सरकारची बोर्डाला अनुमती
प्रतिनिधी / पणजी
दहावी-बारावी परीक्षेचा घोळ संपुष्टात आला असून त्या परीक्षा घेण्यास गोवा बोर्डाला राज्य सरकारने अनुमती दिली आहे. त्यानुसार गोवा बोर्डाने बारावीचे शिल्लक पेपर्स येत्या 20 ते 22 मे रोजी तर दहावीची परीक्षा 21 मे पासून घेण्याचे निश्चित केले आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव भागिरथ शेटये यांनी त्यास दुजोरा देऊन उपरोक्त माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, दहावी बारावीचे पेपर्स सकाळी 9 वाजता सुरू होणार असून यापूर्वी ठरलेल्या परीक्षा केंद्रावरच ती घेतली जाणार आहे. बारावीचे तीन पेपर्स 20, 21 व 22 मे रोजी होणार आहेत. ते पेपर्स अनुक्रमे मराठी, राज्य शास्त्र (पॉलिटकल सायन्स), भूगोल (जॉग्रॉफी) असे आहेत. बारावीची परीक्षा 17 केंद्रांतून पूर्वीच्याच परीक्षा केंद्रात घेतली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहावीची परीक्षा 28 केंद्रातून
दहावीची परीक्षा एकूण 28 केंद्रातून होणार असून त्यासाठी सुमारे 20,000 परीक्षार्थी आहेत. 21 मे पासून दहावी परीक्षा सुरू होणार आहे. पहिला पेपर इंग्रजी असून 1 जून रोजी विज्ञान (सायन्स) हा शेवटचा पेपर होऊन परीक्षा संपुष्टात येणार आहे. नियमित परीक्षार्थींसाठी 21 मे ते 1 जून अशी परीक्षा होणार आहे, तर विशेष मुलांसाठीचे पेपर्स (ठराविक विद्यार्थी) जूनच्या पहिल्या आठवडय़ाच्या अखेरपर्यंत होणार आहेत. दहावीचा दुसरा पेपर हिंदी असून तिसरी भाषा हा तिसरा पेपर आहे. एकंदरीत नवीन वेळापत्रक लगेचच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारावीचे उर्वरीत तीन पेपर्स होणार
यापूर्वी 2 एप्रिल रोजी दहावीची परीक्षा ठरली होती, परंतु कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. बारावीची परीक्षा फेब्रुवारी अखेरपासून सुरू झाली होती आणि 24 मार्चला संपणार होती. परंतु तत्पूर्वीच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मराठी, पॉलिटीकल सायन्स, जॉग्रॉफी या तीन विषयांचे पेपर्स शिल्लक राहिले होते. दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्यामुळे दहावीची पूर्ण परीक्षा व बारावीचे शिल्लक पेपर्स आता होणार हे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही परीक्षेसाठी 10 दिवस आधी पूर्वसूचना देण्यात येईल असे सांगण्यात आले होते आणि आता प्रत्यक्षात 15 दिवस आधी पूर्वसूचना देण्यात आली आहे.
निर्णय झाल्यामुळे पालक-विद्यार्थ्यी चिंतामुक्त
गेले सुमारे 50 दिवस दहावी व बारावी परीक्षेबाबत उलटसुलट चर्चा चालू होती. अनेकांनी ती परीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती, तर ती रद्दच करावी अशी देखील मागणी पुढे येत होती. ती परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात येत असल्याने विद्यार्थी, पालक चिंताग्रस्त झाले होते. या परीक्षेतून एकदाची सुटका व्हावी म्हणून विद्यार्थी, पालक प्रतीक्षा करीत होते. ती प्रतीक्षा आणि चिंता आता संपुष्टात आली आहे.
दोन्ही परीक्षांसाठी स्वयंसेवकांची गरज
सामाजिक अंतर, मास्क, इतर सर्व नियम अटी, तत्वे पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांना जादा केंद्रांची गरज पडणार आहे. तेव्हा शेजारील शाळा त्यासाठी घेण्यात येणार असून शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना यांना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य मागितले जाणार आहे., दोन्ही परीक्षांसाठी स्वयंसेवकांची गरज भासणार असून ते शिक्षण क्षेत्रातील संस्था, संघटनांनी द्यावेत म्हणून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
परीक्षांबाबत ‘तरुण भारत’च्या चळवळीला यश दहावी व बारावी परीक्षेबाबत सरकारने व गोवा बोर्डाने तातडीने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा म्हणून ‘तरुण भारत’ने हा विषय गेले काही दिवस लावून धरला होता. शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया देऊन परीक्षांचा प्रश्न सोडवावा. मुलांची, पालकांची परीक्षेच्या ताणातून मुक्तता करावी म्हणून मागणी करण्यात येत होती. तरुण भारतने याबाबत सर्व अंगांनी चर्चा घडवून आणली. त्याची योग्य दखल सरकारने, बोर्डाने घेतली आणि शेवटी एकदाची परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले. चालू असलेले लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षांच्या तारखा ठरवण्यात येतील, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. त्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी पुढे आली आणि शेवटी फेरविचार होऊन तारखा निश्चित झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.