समाजकंटकांवर कारवाईकडे दुर्लक्ष : सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मराठी-कन्नड भाषेतील दिशादर्शक फलकाची उभारणी
प्रतिनिधी / येळ्ळूर
देसूर-राजहंसगड रस्त्यावर मराठी भाषिकांनी स्वखर्चाने मराठी भाषेमध्ये दिशादर्शक फलक लावला होता. मात्र नेहमीच मराठी भाषिकांवर व मराठी भाषेबद्दल कावीळ असलेल्या काही समाजकंटकांनी तेथील फलक पाडला. त्यानंतर पुन्हा मराठी भाषेतील फलक उभारण्यात आला. झोपी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आता जाग आली असून मराठी-कन्नड भाषेमध्ये तेथे दिशादर्शक फलक उभारला आहे.
सीमाभाग हा मराठी बहुल भाग आहे. त्यामुळे सीमाभागामध्ये मराठी भाषेतूनच व्यवहार होत असतात. काही कन्नड भाषिक असले तरी त्यांनाही मराठी भाषा अवगत आहे. मात्र मराठी भाषेबद्दल तिरस्कार करणारे काही मोजकेच समाजकंटक दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे सीमाभागातील वातावरण गढूळ बनत आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन हे अशा समाजकंटकांना पाठीशी घालत आहेत. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मराठी भाषेतील फलक हटविल्यानंतर त्या समाजकंटकांवर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र कोणतीच कारवाई केली गेली नाही. मराठी भाषिकांनी इतर भाषेच्या फलकावर हल्ला केला असता तर मात्र लगेच दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असती. मात्र अजूनपर्यंत या फलकाबद्दल एकावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यावरून कर्नाटकात विशेषकरून सीमाभागात लोकशाही आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने यापूर्वीच त्या ठिकाणी फलक उभा करणे गरजेचे होते. कारण राजहंसगड हे ऐतिहासिक स्थळ आहे. राजहंसगड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र त्यांना कोणत्या दिशेला गड आहे किंवा कोणते गाव कोणत्या दिशेला आहे, हे समजत नव्हते. त्यामुळे काही मराठी कार्यकर्त्यांनी हा फलक उभा केला होता. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून फलकाची उभारणी केली होती. आपल्या भाषेसाठी सर्व तयारी मराठी भाषिकांमध्ये असते. तेच इतर भाषिकांमध्ये नाही. कारण आजपर्यंत कोठेही स्वखर्चातून या समाजकंटकांनी फलक उभा केला नाही किंवा कोणाला मदत केली नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे.