विद्यार्थ्यांची गैरसोय होणार दूर : परीक्षेसाठी जावे लागत होते गोवा, कोल्हापूर, मुंबई, पुण्याला
प्रनिनिधी / कणकवली:
अकरावी, बारावी सायन्सला ऍडमिशन घेणाऱया विद्यार्थ्यांना पुढे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावयाचे असेल तर जेईई किंवा नीट या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. आपल्या जिल्हय़ात या परीक्षांसाठीचे सेंटरच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागत होता. अखेर सिंधुदुर्गसाठी 2021 च्या ‘नीट’ परीक्षेकरिता सेंटर मंजूर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये नीट व जेईईसाठीचे सेंटर मंजूर व्हावे, अशी मागणी होत होती. ‘दै. तरुण भारत’च्या माध्यमातून याकडे लक्षही वेधण्यात आले होते. पालकमंत्री उदय सामंत, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. गतवर्षी नीटसाठीचे सेंटर सिंधुदुर्गला मंजूर झाले नसले तरिही यावर्षी ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर सिंधुदुर्ग व रत्नागिरीसाठी नीट परिक्षेसाठीचे स्वतंत्र सेंटर मंजूर करण्यात आले आहे.
जवळचे सेंटर नसल्याने जाण्यायेण्यासाठीच्या अडचणीमुळे विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षांना कमी प्रमाणात बसतात. जेईई परीक्षा ऑनलाईन होते, तर नीट परीक्षा ऑफलाईन होते. या परीक्षेसाठीचे सेंटरच सिंधुदुर्गमध्ये नसल्याने आपल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी गोवा, कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्याला जावे लागते. त्यामुळे काही विद्यार्थी ही परीक्षा देण्याचेच टाळत हाते. आपल्याकडे बारावीपर्यंतचे मेरिट चांगले असतानाही मुले त्यानंतर मागे पडत होती. या परीक्षेसाठी जिल्हय़ाबाहेर जाणे येणे, वाहन सुविधा या सर्व खर्चिकबाबींचा विचार केला तर अनेक पालक आपल्या पाल्यांना या परीक्षेंना बसवत नव्हते. मात्र, आता या सेंटरला मान्यता देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.