अडीच महिन्यानंतर साई केंद्रातून आपापल्या गावी प्रयाण
नवी दिल्ली
जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोव्हिड 19 महामारीचा प्रसार रोखण्याच्या हेतूने मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे गेले अडीच महिने बेंगळूर केंद्रात अडकलेल्या भारतीय हॉकीपटूंना अखेर घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरची ओढ लागलेल्या या खेळाडूंना शुक्रवारी एक महिन्याचा ब्रेक देण्यात आला असून ते आपापल्या गावी रवाना झाले आहेत.
महिला व पुरुष हॉकी संघांतील खेळाडू लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 25 मार्चपासून बेंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) वास्तव्य करीत आहेत. शुक्रवारी यातील काही जण वगळता बाकीचे खेळाडू आपापल्या गावी रवाना झाले आहेत. ‘दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांशी चर्चा केल्यानंतर हॉकी इंडियाने खेळाडूंना आवश्यक असलेला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले. ‘सर्व खेळाडूंना केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्त सूचना देण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग अमलात आणण्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत आपल्या खेळाडूंनी एकसंध राहून खूप छान पद्धतीने परिस्थिती हाताळली असून त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. या ब्रेकमध्येही ते जबाबदारीने वागतील, अशी आम्हाला खात्री वाटते,’ असेही ते म्हणाले.
काही आठवडय़ांपूर्वी खेळाडूंनी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली तेव्हा, घरची ओढ लागली असल्याचे त्यांना सांगितले होते. पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक सुरज करकेरा, महिला संघातील वंदना कटारिया, सुशीला चानू, लालरेमसियामी वगळता अन्य सर्व खेळाडूंनी शुक्रवारी सकाळी साई केंद्र सोडले असून ते आपापल्या गावी रवाना झाले आहेत. ‘सुरज हा मुंबईचा असून तेथील कोरोनाची परिस्थिती चिघळली असल्याने तो गेला नाही तर सुशीला, वंदना, लालरेमसियामी त्यांच्या राज्यातील कोव्हिड 19 च्या नियमावलीमुळे जाऊ शकल्या नाहीत,’ असे सूत्राने सांगितले. सुशीला चानू मणिपूरची आहे तर वंदना व लालरेमसियामी उत्तराखंड व मिझोरमच्या आहेत.
पुरुष संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्यासह सर्व साहाय्यक स्टाफही आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध असल्याने जाऊ शकलेले नाहीत. मात्र महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक सोएर्द मारिने व विश्लेषण प्रशिक्षक जॅनेक स्कॉपमन हे मुंबईमार्गे नेदरलँड्सला निघाले आहेत. 19 जुलै रोजी दोन्ही संघातील सर्व खेळाडू पुन्हा बेंगळूरमधील केंद्रावर एकत्र येणार आहेत.