लष्कराच्या नवीन भरती योजनेविरोधात मुझफ्फरपूरमध्ये निदर्शने
@ पाटणा / वृत्तसंस्था
सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱयाच दिवशी बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली. आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे ट्रक अडवल्यावरनंतर त्यांनी मुझफ्फरपूरमधील मादीपूर येथेही रास्तारोको केला. याशिवाय आरा येथेही बराच गदारोळ झाला. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आणि जीआरपीने प्रयत्न केले. मात्र, आंदोलक ‘अग्निपथ’ योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याने संघर्ष कायम आहे. जोपर्यंत लष्करी अधिकारी आपल्या समस्या ऐकून घेत नाहीत, तोपर्यंत आपण रस्ता सोडणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही शाखांमध्ये मोठय़ा संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. या योजनेवरूनच बिहारमध्ये बुधवारी सैन्यभरती कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच मुझफ्फरपूरमध्ये शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरत गोंधळ आणि निदर्शने करण्यास सुरुवात केली. प्रथम आंदोलक एआरओ (लष्कर भरती कार्यालय) येथे पोहोचले. तेथे निषेध केल्यानंतर आंदोलकांनी मादीपूरला जाळपोळ करून रास्तारोको केला. यासोबतच रस्त्याच्या आजूबाजूचे फलक, होर्डिंग्सची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला.
बक्सरमध्ये आंदोलकांनी बक्सर स्टेशनच्या गोदामाजवळ दिल्ली-कोलकाता रेल्वे अडवली. या प्रकारानंतर घटनास्थळी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे स्टेशन, बक्सरसह शहर पोलीस ठाणे, रेल्वे व्यवस्थापक पोहोचले. आंदोलकांची समजूत घातल्यानंतर ट्रकवरून लोकांना हटवून रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली. खासदार-आमदारांना 5 वर्षांचा वेळ मिळत असताना चार वर्षांसाठी भरती केलेल्या युवकांना आयुष्यात काय फायदा होणार? असा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. भरती झालेले युवक 4 वर्षांनी पुन्हा रस्त्यावर येणार असल्याने लष्करातील नियुक्तीची ही योजना रद्द करावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.