नगराध्यक्ष संजू परब यांची पालकमंत्र्यांकडून अपेक्षा
वार्ताहर / सावंतवाडी:
गेल्या 25 वर्षात विरोधकांनी एकदाही अग्निशमन बंब आणण्याबाबत अथवा अग्निशमन केंद्र उभारण्याबाबत कुठल्याच हालचाली केल्या नाहीत. 25 वर्ष खराब अग्निशमन बंब वापरला. आता येत्या दोन दिवसात हा बंब निर्लेखित करण्यात येणार आहे. तसेच पालिकेशेजारील नियोजित जागेत अग्निशमन केंद्र उभारणीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला आहे. आता पालकमंत्री उदय सामंत यांनी हा निधी मंजूर करून राजा हरिश्चंद्राप्रमाणे दिलेले वचन पाळावे. मग त्यांच्याच हस्ते अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन करू, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सावंतवाडी नगरपालिकेच्या नवीन इमारतीचा आराखडा लवकरच सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नासीर शेख उपस्थित होते. आठवडाभरापूर्वीच सावंतवाडी नगरपालिकेला पालकमंत्री सामंत यांनी भेट दिली होती. त्यावेळी नगराध्यक्ष परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेला अग्निशमन केंद्र मंजूर आहे. त्याला निधी द्या. तसेच सध्याचा अग्निशामक बंब खराब झाला आहे. नवीन बंब खरेदीसाठीही निधी द्या, अशी मागणी केली होती. त्यावर सामंत यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी राजा हरिश्चंद्राच्या वचनाची आठवण परब यांनी करून दिली होती. त्यावेळी सामंत यांनी वचनपूर्तीची ग्वाही दिली होती. हाच धागा पकडून नगराध्यक्ष परब यांनी अग्निशामक केंद्राच्या मागणीचा प्रस्ताव तयार करून तो पाठवला आहे. आता पालकमंत्र्यांनी आपले वचन पाळावे. अग्निशमन केंद्राला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले.
नवीन बंबाचा प्रस्ताव
पालिकेचा सध्याचा बंब 25 वर्षांपूर्वीचा आहे. पूर्वीचे सत्ताधारी आणि आताच्या विरोधकांनी या जुन्याच बंबावर काम केले. आता हा बंब आपण दोन दिवसात निर्लेखित करणार आहोत. नव्या बंबाचा 77 लाख रुपये खर्चाचाही प्रस्ताव तयार केल्यचे स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील भाजी मार्केटची नवीन इमारतही लवकरच उभारण्याबाबत निर्णय झाला आहे. तसेच पालकमंत्री सामंत यांनी सांगितल्यानुसार पालिकेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात प्रभागवार लसीकरण व्हावे!
सावंतवाडी शहराची सध्याची लोकसंख्या 40 हजार आहे. अधिकृत लोकसंख्या 25 हजार असून त्यात फक्त 56 कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या घटली, ही चांगली बाब आहे. सावंतवाडी शहरात कोरोना रुग्णांना उपचारासाठी किट देण्यात यावे. तसेच शहरात लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली जाणार आहे. शहरात प्रभागवार लसीकरण करण्याचा
प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. mp