सावंतवाडीसाठी 2011 मध्ये मंजूर झाले केंद्र : जागा उपलब्ध असूनही होतोय विलंब
संतोष सावंत / सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र मंजूर होऊन नऊ वर्षे उलटली, तरी एक साधा सुस्थितीतील बंबही नगरपालिकेकडे उपलब्ध नाही. सुमारे 40 लाख रुपये नगरविकास विभागांतर्गत जमा आहेत. मात्र, अग्निशमन केंद्र उभारण्यास मुहूर्त मिळत नाही. नूतन नगराध्यक्ष संजू परब यांनी पदभार घेऊन सहा महिने झाले. त्यांनीही अग्निशमन केंद्राची जागा पालिक इमारतीला लगून असतांनाही गती दिलेली नाही.
नगरपालिकेसाठी 14 फेब्रुवारी 2011 मध्ये अग्निशमन केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी 40 लाख रुपये निधी मंजूर होता. निधी न. पा. कडे वर्गही झाला. तत्कालीन नगरविकासमंत्री भास्कर जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांनी सदर केंद्र मंजुरीसाठी अथक प्रयत्न केले. केंद्र मंजुरीवेळी तत्कालीन नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, श्वेता शिरोडकर, बबन साळगावकर यांनी प्रयत्न केले. जागेचा प्रश्न सोडविला. मात्र, केंद्र सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला नाही.
अग्निशमन केंद्राची रचना
अग्निशमन केंद्रासाठी शासनाचे 40 लाख रुपये तर पालिकेचे दहा लाख असे 50 लाख मंजूर होते. केंद्रांतर्गत चार अग्निशमन बंब, जीप, केंद्र अधिकारी, उप अधिकारी, चालक, यंत्रचालक, अग्निशमन विमोचक सातजण असे 32 अधिकारी, कर्मचारी पदे मिळणार आहेत. पालिकेच्या इमारतीच्या बाजूलाच 1900 चौरस मीटर जागा आहे. तेथे पूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय कार्यालय भाडेतत्वावर होते. ते कार्यालय हलविण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना प्रयत्न करावे लागले होते. नगरविकास मंत्री उदय सामंत असतांना त्यांनी ही जागा खाली करून देण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या. त्यानंतर ते कार्यालय कसाल येथे स्थलांतरित झाले आणि अग्निशमन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला.
अग्निशमन केंद्र उभारणीसाठीचा आराखडा प्रस्ताव साळगावकर यांनी बांधकाम विभागाकडून तयार केला. परंतु पाच वर्षे हा प्रश्न रेंगाळला. केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात केंद्र उभारणीबाबत बैठका घेतल्या. पण काही झाले नाही.
जागेचे 17 लाखाचे मूल्यांकन
1900 चौ. मी. जागेसाठी पालिकेने 17 लाख रुपये मूल्यांकन केले आहे. बांधकाम विभागाने या जागेवर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण पालिकेने आपल्या मालकी हक्कात ती राखली आहे. शासनाकडून या केंद्रासाठी 40 लाख मंजूर आहेत. उर्वरित दहा लाख नगरपालिका कुठून आणणार? आता तर या केंद्रासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.
उरले 550 दिवस
नगराध्यक्ष संजू परब यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. आमदार नीतेश राणे यांनी आम्हाला 720 दिवस द्या. आम्ही शहराचा विकास करतो, असे स्पष्ट केले होते. त्यातील आता फक्त 550 दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत तरी अग्निशमन केंद्राची वीट तरी लागावी, अशी अपेक्षा आहे.
सध्या पालिकेला दोन बंबांची गरज आहे. पण अग्निशमन केंद्र मंजूर असल्याने त्यांना शासनाकडे मागणी करता येत नाही.