नवा प्लॅन तयार, तांत्रिक मंजुरी घेणार : सध्याची इमारत 1971 सालची
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी पालिकेच्या इमारतील तब्बल 51 वर्षे झाली असून पालिका
प्रशासनाने इमारतीचा नवीन प्लॅन आर्किटेक्टकडून बनवून घेतला आहे. सावंतवाडी शहरात अग्निशामक केंद्र मंजूर होऊन तब्बल दहा ते बारा वर्ष होत आली. तरी अद्यापही हे केंद्र प्रत्यक्षात उभारलेले नाही. मात्र, आता अग्निशामक केंद्राची जागा निश्चित झाली असून नऊ गुंठे जागेत अग्निशामक केंद्र व सावंतवाडी नगरपालिकेची नवीन इमारत असा तीन मजली इमारतीचा प्लॅन तयारही झाला आहे. साडेतीन कोटी रुपये खर्चाचा अग्निशामक केंद्राचा आराखडाही तयार झाला आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
सावंतवाडी संस्थानकालीन शहर आहे. या शहरात त्यावेळी पालिका अस्तित्वात येण्यापूर्वी मुन्सिपल अधिकारी नियुक्त होते. तेव्हा शहराचा कारभार सध्या असलेल्या पालिकेच्या इमारतीच्या जागेवरील छोटय़ा खोलीतून चालत असे. सदरची मातीची इमारत 1908-1909 मध्ये मुन्सिपल कारभारासाठी घेण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास या जागेत तब्बल 112 वर्षाहून अधिक काळ पालिकेचा कारभार सुरू आहे. 1971 मध्ये मातीच्या इमारतीला लागूनच पालिकेची इमारत उभारण्यात आली. सदर जुन्या इमारतीचा मातीच्या भिंतीचा भाग अजूनही ‘जैसे थे’ आहे. पालिकेच्या कागदोपत्री जुन्या इमारतीची नोंद आहे. आता पालिकेचा वाढता व्याप पाहता मोठय़ा इमारतीची गरज भासत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आराखडे तयार करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला होता. परंतु ती प्रक्रिया रखडली. आता पालकमंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या इमारतीला सहकार्य करू, असे वक्तव्य केले होते. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
भास्कर जाधव यांच्या काळात निधी
पालिकेची बाजारपेठेत अकरा गुंठे जागा आहे. सध्याच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या ज्यात पूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय होते, ती नऊ गुंठे जागा आहे. ती पूर्वीपासून अग्निशामक केंद्रासाठी राखीव आहे. सावंतवाडीच्या ‘क’ वर्ग नगरपालिकेला तत्कालीन नगरविकासमंत्री भास्कर जाधव यांनी अग्निशामक केंद्रासाठी निधी मंजूर केला होता. त्यावेळी नगराध्यक्षपदी श्वेता शिरोडकर व त्यानंतर पल्लवी केसरकर होत्या. अग्निशामक केंद्र मंजूर झाले होते. त्यानंतर नगर विकासमंत्री उदय सामंत यांच्याकडे कारभार आला होता. नगराध्यक्ष बबन साळगावकर असताना या केंद्राबाबत त्यांनी पाठपुरावा केला. राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सदरचे कार्यालय या पालिकेच्या इमारतीच्या जागेतून स्थलांतरित करण्यात आले. तरीदेखील अग्निशामक केंद्र उभारण्यातील अडसर दूर झाला नव्हता. अग्निशामक केंद्राचा निधीही परत गेला. अनेक प्रस्ताव व आराखडेही तयार करण्यात आले. आता पुन्हा अग्निशामक केंद्र उभारण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष परब यांनी पावले उचलली आहेत.
नव्या आराखडय़ात तळमजल्यावर अग्निशामक केंद्र तर दुसऱया व तिसऱया मजल्यावर नगरपालिकेची इमारत प्रस्तावित आहे. आराखडा तांत्रिक मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या केंद्रामध्ये जवळपास ऐंशी लाख रुपये खर्चाचा नवीन बंब असेल. येत्या चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल.
मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी तांत्रिक मंजुरी येत्या आठ दिवसात मिळेल. त्यानंतर प्रस्ताव तयार केला जाणार आहे. इमारत उभारण्याचा दृष्टीने निधीसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करणार आहोत. त्यानंतर सध्याच्या इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव तयार केला जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया येत्या चार महिन्यात केली जाईल.