प्रतिनिधी / कराड
अचानक लागलेल्या आगीत सुमारे दीडशे एकर ऊस जळून खाक झाला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या आगीत वारुंजी व केसे (ता. कराड) येथील सुमारे 80 शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सर्व ऊस जळल्यानंतर रात्री उशिरा ही आग विजली.
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू झाले असून ऊसतोड हंगाम जोराने सुरू आहे. अशातच आज बुधवारी अचानक वारुंजी येथील शिव नावाच्या शिवारात एका शेतातील ऊसाने अचानक पेट घेतला. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण करत आजूबाजूचा ऊस आवाक्यात घेतला. ऊस जळत असताना या शेतांच्या जवळच असलेल्या सरवळीच्या बाजूच्या पानकणसांनीही पेट घेतला. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळे वारुंजीच्या शिवारात लागलेली ही आग काही तासातच केसे गावच्या हद्दीत पोहोचली. आगीने तेथील उसाच्या शेतांना विळखा घातला.
आगीचेप्रमाण वाढल्याने मोठमोठे धुराचे लोट येऊ लागले. परिसरातील शेतकऱ्यांनी काही वेळातच आपल्या शेताकडे धाव घेतली, मात्र आगीने अधिकच रौद्ररूप धारण केले होते. काही शेतकऱ्यांनी एकत्र येत जळणाऱ्या उसातील काही भाग सोडवल्याने तेथून पुढचे ऊसक्षेत्र जळण्यापासून वाचले. मात्र त्यादरम्यान सुमारे दीडशे एकर ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले. यामध्ये 70 ते 80 शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचा ऊस जळून खाक झाला आहे.
शिवारात जाणारा रस्ता खराब असल्याने या शेतकऱ्यांना कोणतीहीही तातडीची मदत त्याठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी तेथील शेतकऱ्यांची आता मागणी आहे. रात्री उशिरापर्यंत आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मोठ्याप्रमाणात जळलेल्या आगीमुळे परिसरात धुरांचे लोट उठले होते.