आसामध्ये अमित शाह यांचा काँग्रेसवर निशाणा
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाम दौऱयावर असलेले गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस पक्षावर शरसंधान केले आहे. बदरुद्दीन अजमल यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे काँग्रेसचे नेते घुसखोरी रोखू शकत नाहीत असे शाह यांनी गुरुवारी म्हटले आहे. अजमल यांचा एआयडीयुएफ हा बंगाली मुस्लिमांचा पक्ष असल्याचे मानले जाते.
आसाम आंदोलनावेळी काँग्रेसनेच तरुण-तरुणींवर गोळीबार करविला होता. राहुल गांधी आता मते मागण्यासाठी वेश बदलून येत आहेत. पण आसामची जनता सर्व ओळखून आहे. भाजपच विकसित, शांत आणि घुसखोरांपासून मुक्त राज्य निर्माण करू शकते हे आसामची जनता ओळखून असल्याचे शाह म्हणाले.
मतांसाठी धार्मिक विधाने
घुसखोर आसामचा गौरव असलेल्या गेंडय़ांची शिकार करत होते, पण तेव्हा सत्तेवर असलेल्या काँग्रेसने ही शिकार रोखण्यासाठी काहीच केले नाही. काँग्रेसला केवळ स्वतःच्या मतपेढीची चिंता होती. अजमल यांच्यासोबत बसून काँग्रेसला घुसखोरी रोखता येणार नाही. अजमल बदरुद्दीन यांना सोबत घेत आसामच्या सुरक्षेबद्दल बोलणे थट्टा करण्याचा प्रकार असल्याची टिप्पणी शाह यांनी केली आहे.
पूरमुक्त आसाम
नगाव येथे पोहोचलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसामला पूरमुक्त करण्याची घोषणा केली आहे. 4 वर्षांपासून उपग्रहाद्वारे पावसाळय़ाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पुढील 5 वर्षांमध्ये आसामला पूरमुक्त करण्यात येणार आहे. मोठमोठे तलाव निर्माण करून पाण्याला वेगळी दिशा देत आसामला पूरमुक्त करण्यात येणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
मनमोहन सिंगांवरही टीका
15 वर्षांपर्यंत राज्यात काँग्रेसचे सरकार राहिले, पण त्यांनी आसामसाठी काहीच केले नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आसाममधूनच राज्यसभेवर गेले होते. त्यांनी 15 वर्षांचा हिशेब द्यावा. काँग्रेसने 70 वर्षांमध्ये जितका विकास केला नाही, त्याहून अधिक आम्ही 7 वर्षांमध्ये करून दाखवू असे शाह यांनी सांगितले आहे.
विकासाच्या मार्गावर अग्रेसर
निदर्शने, हिंसाचारासाठी ओळखला जाणारा आसाम आता हिंसाचार, पूर तसेच घुसखोरीपासून मुक्त होत विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. ईशान्येतील अन्य राज्यांसह जीडीपीत सर्वाधिक योगदान देणारे राज्य म्हणून आसाम उदयास येईल तेव्हाच भाजपचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे विधान शाह यांनी केले आहे.