प्रतिनिधी/ सातारा
किल्ले अजिंक्यताऱयाच्या रस्त्याचे काम निधी नसल्याने गेल्या तीन वर्षापासून हे काम रखडले गेले आहे. आता निवडणूकीच्या तोंडावर गटरचे काम सुरु करण्यात आले आहे. तेही काम कसेबसे दर्जाहिन केले जात आहे. गटरच्या कामामध्ये सिमेंटचे प्रमाण अतिशय अल्प असे आहे. ठेकेदारास समज देवून काम दर्जेदार असे करण्यात यावे, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.
सातारा शहर किल्ले अजिंक्यताऱयाच्या पायथ्याला वसले आहे. याच किल्ले अजिंक्यताऱयाच्या रस्त्याचा वनवास काही केल्या संपत नाही. आमदार शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नाने अजिंक्यताऱयाच्या रस्त्याला निधी आणला. कामही सुरु झाले परंतु ते कामच अर्धवट राहिले गेले. अर्धेच काम झाल्याने किल्ले अजिंक्यताऱयावर जाणाऱया शिवभक्तांना हे काम पूर्ण कधी होणार अशी आस्थेने चौकशी केली जाते. परंतु जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हे काम निधी अभावी पुर्ण होत नसल्याचे सांगण्यात येते. आता मात्र निवडणूकीच्या तोंडावर रस्त्याच्या कडेच्या गटरचे, चाऱया तयार करण्याचे काम सुरु आहे. हे काम करताना पावसाच्या पाण्यामुळे येणारा प्रवाह मोठया प्रमाणात असतो. त्या प्रवाहापुढे काम टिकले पाहिजे. याकरता दर्जेदार काम होण्याऐवजी अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. ही बाब शिवभक्तांच्या निदर्शनास आली असून चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
चांगले काम करावे
किल्ले अजिंक्यताऱयाकडे जाणारा रस्ता चांगला व दर्जेदार असा व्हावा, त्याकरता सुमार दर्जाचे काम करु नये. अशी आमची भावना आहे.
मनोज देशमुख जायंट्स क्लबचे माजी अध्यक्ष