रुग्णांचे रद्दी बेड्स, रद्दी कपडे भिंतीकडेलाच टाकतात
प्रतिनिधी / सातारा
येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या लागून असलेल्या अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी आणि सह्याद्री कॉलनी या तीन कॉलन्या गेल्या पाच ते सहा वर्षापासून समस्यांच्या गर्तेत अडकल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील अस्वच्छता, शवविच्छेदन खोलीबाहेर टाकलेले वेस्टेज साहित्य, रद्दी बेड्स, रुग्णांचे रद्दी कपडे तसेच सातत्याने कोपऱयात टाकले जातात. त्यामुळे भिंतीला लागून असलेल्या घरांतील रहिवांशाना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. डासांचा सतत प्रादुर्भाव होत असल्याने मच्छदरदानी, डासांच्या अगरबत्त्या वापरुनही नागरिक दमले. जिल्हा रुग्णालयाला विनंत्या करुनही झाल्या आता आंदोलनाच्या पवित्र्यात नागरिक आहेत.
सदर बाजार येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे अजिंक्य कॉलनी, सह्याद्री कॉलनी आणि रामकृष्ण कॉलनी अशा तीन कॉलन्या आहेत. या तिन्ही कॉलन्यांना यापूर्वी एवढा त्रास होत नव्हता. परंतु गेल्या पाच वर्षापासून सातत्याने जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील अस्वच्छतेचा त्रास होतो. रुग्णालयाच्या पश्चिम बाजूला शवविच्छेदन खोली आहे. त्या खोलीला लागूनच कोपऱयात झाडीत रुग्णालयात वापरलेले रद्दी झालेले बेड्स, रुग्णांचे वापरलेले रद्दी कपडे तसेच टाकून देण्याचे वारंवार प्रकार होतात. तसेच जैविक कचरा व शवविच्छेदन केल्यानंतर जे वेस्टेज साहित्य असते ते तसेच कोपऱयात ठेवून दिले जाते. त्यापासून नजिक असलेल्या तीन कॉलन्या आहेत. त्या कॉलन्यांना नित्याचा त्रास होत आहे. या कचऱयापासून होणारे डास, दुर्गंधी याला सामोरे जावे लागत आहे. कित्येकदा निवेदने, अर्ज विनंत्या करुनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक ही समस्या घेवूनच रहातात. कोरोनाच्या काळातही त्यांनी ही समस्या घेवूनच त्रास सहन केला. आता मात्र, आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
डासांचा त्रास होतोय
आमच्या घराकडेला असलेली झाड तोडावीत. नाला स्वच्छ करावा.औषध फवारणी करावी. आम्ही म्हातारी माणसं. पैसा होता त्यावेळी करत होतो. आता करता येत नाही. सिव्हीलने सगळा कचरा काढावा. स्वच्छता ठेवावी.
बबई बागल
गेली पाच वर्ष मी बऱयापैकी सिव्हीलमध्ये तक्रारी दिलेल्या आहेत. आमच्या पाठीमागे इतकी मोठमोठी झाडे आहेत. त्याच्याशिवाय त्यांचे कन्स्ट्रंक्शन सुरु आहे. त्यांचा त्रास आहे. सांडपाण्याचा प्रश्न आहे. वाढलेली झाडी आहे. त्यामुळे संध्याकाळीच काय पण दिवसभरात सुद्धा उभ राहण मुश्किल होतं. इतके डासांचे थवेच्या थवे आहेत. ही झाडी त्वरीत स्वच्छ करुन घ्यावी. कोरोनाच्या काळात खुप त्रास होत आहे. त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी.
नंदा जाधव
स्वतःचा बंगला असून तुरुंगासारखे रहावे लागते
सहा वर्ष झाले काथ्याच्या गाद्या, खाटा, प्लास्टिकची बाटल्या टाकलेल्या आहेत. बारीक किटक घरात येतात. बॅडेज जाळतात. प्रेत सुद्धा तेथे ठेवली जातात. त्यामुळे रोगराई पसरते. खिडक्या लावून स्वयपाक करावा लागतो. स्वतःचा बंगला असून तुरुंगासारखे रहावे लागते. सरकार सांगते स्वच्छता पाळा म्हणून काय स्वच्छता पाळली जाते. निवेदन दिलेले आहेत. तरीही कार्यवाही करत नाही. आता राजांना भेटाव लागेल.