ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. आम्हाला चर्चा करण्यावर विश्वास आहे. अनेक दिवसांनंतर 17 ते 18 दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत हीच आमची भूमिका असेल. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही. मागच्या अधिवेशनात त्यांनी ठामपणे सांगितलं वीज कनेक्शन कापणार नाही. आणि आता स्पर्धा सुरु असल्यासारखं शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. शेतकऱ्यांना आपलं उभं पीक जळताना पाहावं लागत आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, मागच्या अधिवेशनात अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं होतं वीज कनेक्शन कापणार नाही. आणि आता स्पर्धा सुरु असल्यासारखं शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर तुम्ही राज्य करत आहात, त्यांच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता. ही अहंकारी भूमिका सरकारने घेतली आहे, तो अहंकार आम्ही तोडायला लावू.
दरम्यान, ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन फडणवीस आज आक्रमक झाले. अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला ठाकरे सरकार पाठीशी घालून नेमकं काय सिद्ध करू पाहतंय? हे आम्हाला माहित नाही. पण आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहोत. त्यासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करणार आहे. तसेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावरही भाजप बहिष्कार टाकत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.