मुंबई \ ऑनलाईन टीम
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप सातत्याने सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे चौकशीची मागणी करत आहेत. दरम्यान, आता भाजपने आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळवला आहे. अजित पवार यांची परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशी करावी असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता. मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंट्समधून महिन्याला १०० कोटींची रक्कम गोळा करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं होतं. या पत्रामुळे मोठा गदारोळ झाल्यानंतर अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
आता याच प्रकरणात अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला आहे.