गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने उसळी मारली. निफ्टीने 9 हजाराचा पल्ला ओलांडला आणि सेन्सेक्सनेही तीस हजाराचा टप्पा ओलांडला. निफ्टीत 363 अंकांची आणि सेन्सेक्समध्ये 1265 अंकांची तेजी आली. कोरोनाचा विळखा संपूर्ण जगाला पडला असला तरी शेअर बाजारात अच्छे दिन परतले की काय असे वाटण्याची शक्मयता आहे. पण एवढय़ाने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण शेअर बाजाराचा कल अजूनही मंदीचाच आहे हे ध्यानात घ्या.
अनेक आठवडे नकारात्मक कल दर्शवणाऱया भारतीय शेअर बाजाराने गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी चांगलीच उसळी मारली. यामुळे आता शेअर बाजारांना लागलेले मंदीचे ग्रहण सुटले असा समज झाला असेल तर भानावर या. कारण शेवटच्या दिवशी शेअर बाजारांनी उसळी मारलेली असली तरी पुढील आठवडय़ात बाजारांचा कल हा मंदीचाच आहे हे ध्यानात ठेवायला लागेल.
आपल्या देशात कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-19 या आजाराच्या साथीचा प्रवास अपेक्षेप्रमाणे होत आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारताची परिस्थिती खूपच बरी आहे. अमेरिका, इटली, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी या सगळय़ा प्रगत देशांनी कोरोनापुढे हात टेकले आहेत. भारताची लोकसंख्या प्रचंड असूनही जितक्मया वेगाने हा आजार आपल्याकडे पसरेल असे वाटत होते, तितक्मया वेगाने तो पसरलेला नाही. कदाचित त्याबद्दलचा दिलासा शेअर बाजारांनी व्यक्त केला असेल.
निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये अतिविक्री झाल्यामुळे ही तात्पुरती तेजी आली आहे. पण बाजारांतील अस्थिरता अजूनही कमी झालेली नाही. पुढील आठवडय़ाची सुरूवात कदाचित स्थिरतेने होईल. पण लगेच दुसऱया दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने बाजार बंद असणार आहे.
कोविड-19 मुळे कोटय़वधी लोकांचा रोजगार गेला आहे, उद्योगधंदे बंद झाले आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रगत देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तरीही भारतीय बाजारात जे घडले तेच आंतरराष्ट्रीय बाजारात घडले आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अमेरिकन सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज. उद्योगधंद्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे.
भारतातही तेच झाले आहे. इथेही सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे आणि आगामी काळात आणखी एक पॅकेज जाहीर होण्याची शक्मयता आहे. सरकारने उचललेली पावले अतिशय समर्थनीय आहेत. संपूर्ण देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय धाडसाचा होता आणि तो मोदी सरकारने घेतला. आता देशात वाढणाऱया कोरोना रूग्णांची संख्या पाहता आणि लॉकडाऊन हाच हा आजार रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी लोक तो सकारात्मकतेनेच घेतील असेच चित्र आहे. याचा एकूण परिणाम बाजारांवर होऊन बाजारातही सकारात्मकता दिसून येईल.
मात्र असे असले तरी बाजार अजूनही प्रचंड दबावाखाली आहेत. 9 हजारांच्या स्तरावर निफ्टी तग धरून राहील अशी अपेक्षा आहे. 9200 ते 9500 दरम्यान निफ्टीत रेजिस्टन्स म्हणजे रोधकता येईल आणि 9 हजार आणि 8700 च्या दरम्यानच्या पातळीवर निफ्टीला समर्थन मिळू लागेल.
सध्या गुंतवणूकदार गोंधळलेल्या मनःस्थितीत आहे. शेअर बाजाराची कनि÷तम पातळी गाठली गेली की आगामी महिन्यात ते आणखी खाली जातील असा संभ्रम त्यांच्या मनात आहे. मोठय़ा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा धोका त्यांना पत्करायचा नाही आणि मध्यम तसेच लहान कंपन्यांच्या शेअर्सच्या आश्वासकतेबाबत त्यांच्या मनात साशंकता आहे. पण आश्चर्याची बाब अशी आहे की या अस्थिरतेच्या काळात या मध्यम आणि लहान शेअर्सनीच शेअरबाजाराची शान टिकवून ठेवली आहे.
कोरोना महामारीत मध्यम आणि लहान कंपन्या टिकणार नाहीत अशी भीती व्यक्त केली जाते. तरीही गुंतवणूकदार लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांवर मदार ठेवून आहेत कारण या संकटातून सरकार या कंपन्यांना मदतीचा हात देईल अशी खात्री गुंतवणूकदारांना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर येणारी मंदी आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात होणारी घसरण भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. भारत पेट्रोलियम, सिएट, ऍव्हेन्यू सुपरमार्ट्स, हॅवेल्स इंडिया, आयसीआयसीआय बँक, ज्युबिलन्ट फूडवर्क्स, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स सध्या घसरलेले आहेत. पण या सर्वच कंपन्यांचे फंडामेंटल्स चांगले मजबूत आहेत. त्यामुळे येत्या काळात या कंपन्यांकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले तर आश्चर्य वाटायला नको.
येत्या आठवडय़ात बाजारात अस्थिरता असणार हे तर स्पष्टच आहे. पण या अस्थिरतेतही काही कंपन्यांच्या शेअर्सनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे एकूण बाजारांपेक्षा स्टॉकनिहाय गुंतवणूक, तिही दिर्घकालीन असेल तर फायद्याची ठरेल.