कराड
पुणे-बेंगलोर अशियायी महामार्गावर नांदलापुर (ता. कराड) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. गुरूवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. अन्वर मुनीर पठाण (वय 42 रा. सदरबझार सातारा) व राजू उर्फ सर्फराज आझाद शेख (वय 35 रा. गुरूवार परज, सातारा) अशी मयतांची नावे आहेत.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अन्वर मुनीर पठाण यांचा वाहतुकीचा व्यवसाय आणि राजू शेख हे चालक असल्याने एका वाहनासाठी लागणाऱया बॉशपंप आणण्यासाठी दोघे इस्लामपूर येथे दुचाकीवरुन गेले होते. परतीच्या प्रवासात कराड जवळील पाचवड फाटा याठिकाणी पोहोचले असता अज्ञात वाहनाने मागून यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही गंभिर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, अपघात विभागाचे खालीद इनामदार, प्रशांत जाधव घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तत्काळ उपजिल्हा रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अन्वर पठाण हे सातारा येथील सदरबझार येथील रहिवाशी असून त्यांचा माल वाहतुकीचा टेम्पो आहे. अन्वर यांच्या पश्चात पत्नी व आई, वडिल असा परिवार आहे. तर राजू उर्फ सर्फराज हे चालक म्हणून काम करत होते. यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. दोघांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतुक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. काही वेळानंतर पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली. उपजिल्हा रूग्णालय येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.