नारदा स्टिंग प्रकरण- सीबीआयने केली होती अटक
वृत्तसंस्था/ कोलकाता
नारदा स्टिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी मंत्री शोवन चटर्जी यांची सोमवारी रात्री उशिरा प्रकृती बिघडली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगातून एसएसकेएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मंगळवारी सकाळी तृणमूल नेते सुब्रत मुखर्जी यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या तिघांसह फिरहाद हाकिम यांना सीबीआयने सोमवारी अटक केली होती.
तत्पूर्वी सीबीआयने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ममता सरकारमधील मंत्री फिरहाद, सुब्रत, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन यांची चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंतर सर्वांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या चारही जणांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन
याप्रकरणी सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे 5 तासाच उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत चारही नेत्यांच्या जामिनाचा आदेश रद्द ठरविला होता.
ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात
तर सीबीआयच्या कारवाइंनंतर पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणा आणि बंगाल सरकार यांच्यात तणाव दिसून आला. मंत्र्यांच्या चौकशीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात पोहोचल्या. मलाही अटक करा, केवळ तृणमूल नेत्यांवरच कारवाई का होतेय? भाजपमध्ये गेलेले मुकुल रॉय आणि शुभेंदु अधिकारी यांच्यावर कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही असे प्रश्न ममतांनी सीबीआयला विचारले आहेत. ममता बॅनर्जी सुमारे 6 तासांपर्यंत सीबीआय कार्यालयात ठाण मांडून होत्या.
सीआरपीएफ जवानांवर हल्ले
बंगालमध्ये अनेक ठिकाणी सीआरपीएफ जवान, सीबीआयचे अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यात फैलावत असलेल्या हिंसाचारावरून ममता यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. याची प्रत राज्यपाल जगदीप धनखड यांना पाठविण्यात आली आहे.