ऑनलाईन टीम / चंदीगढ :
संयुक्त किसान मोर्चाने 26 जानेवारीला दिल्लीत काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर 83 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना पंजाब सरकारने प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने या वर्षी 26 जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. त्याच दिवशी काही शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर असलेली बॅरीगेट्स तोडून सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. तसेच लाल किल्ल्यावर केसरी ध्वज फडकवला होता. त्यावेळी शेतकरी आणि दिल्ली पोलिसांच्या गटात धरपकड झाली. यात 200 हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर 83 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
चन्नी म्हणाले, केंद्रीय कृषी सुधारणा कायद्यांविरोधात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझ्या सरकारचा पाठिंबा असून 26 जानेवारी 2021 रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 83 जणांना आम्ही प्रत्येकी दोन लाख नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.