25 डिसेंबर 1924 रोजी नियतीने जगाला दोन अनमोल रत्न दिली. एक जगाला नवीन जीवन धर्माचा विचार सांगणारा येसू ख्रिस्त व दुसरा समाजात राहून संन्यासासारखे जीवन जगणारा. त्यांचं नाव अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी. दोघांचा जन्म एकाच दिवशी. अटलजी म्हणजे, संघप्रचारक, शालिनता, संयम आणि सौजन्य यांचा संगम, आधुनिक भगीरथ, माझ्या मते अटलजी राजकारणी नव्हते ते मुत्सदी होते. राजकारणात आघाडी ही कधी समंजसपणाने, विचारविनिमय करून होते. तर विश्वासघाताने होते. आघाडीचं आयुष्य फार कमी असतं. परंतु आघाडी सरकारचा यशस्वी प्रयोग जर कुणी केला असेल तर अटलजींनी. निरनिराळय़ा क्षेत्रातील नामवंत वक्त्यांची भाषण ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळशास्त्री हरदास, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कर्नाटक केसरी जगन्नाथराव जोशी असे अनेक परंतु एक असामान्य वक्ता म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. अटलजींच्या विचाराशी सर्व श्रोते सहमत असतील, असे नाही परंतु त्यांचे वक्तृत्व ऐकून श्रोता मंत्रमुग्ध झाला नाही, तरंच आश्चर्य. भाषा प्रभूत्व, प्रवाही वक्तृत्व आणि वांङ्मयीन प्रतिभा, यांच्या बळावर त्यांनी एक प्रचंड संघटना निर्माण केली. संघानी अटलजींना राजकीय क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी दिली तो काळ अत्यंत कठीण होता. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. परंतु त्याला स्वैराचाराची लागण झाली होती. नि÷ा, प्रामाणिकता, विचारसरणीचे भाव बाजारात राजरोसपणे विकले जात होते. अशावेळी वैभव संपन्न, बलशाली भारताचं स्वप्न साकार करण्याच्या जिद्दीन अटलजी उभे राहिले. ज्या वयात तारुण्यात स्वाभाविक असलेली सारी स्वप्न विसरुन सुसंस्कृत वैभवसंपन्न राष्ट्र निर्माण करण्याचे काम हाती घेतलं. आयुष्याच्या चक्रात आहुती देत म्हणत होते. ‘राष्ट्राय हरं न मम्।। आणि तो याज्ञिक म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. अटलजी कवी मनाचे होते. त्यांचे काव्य हे राष्ट्र चिंतनाचे होते. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. आनंदी आनंद. परंतु एक कलंक आणि तो विभाजनाचा. स्वातंत्र्याचा अभिमान सर्वांना होता. अटलजी त्याला अपवाद नव्हते. ज्या शाईच्या एका रेखेने देशाचे विभाजन झाले. देशाचा दुसरा भाग पाकिस्तान म्हणून ओळखला गेला. तेथील परिस्थिती अटलजींच्या कवी मनाला वेदना देत होती. भारतात स्वातंत्र्याची दिवाळी साजरी होत होती. परंतु पाकिस्तानात अमावस्या होती. अनेक घरातील दिवे बुझले होते. अटलजी व अनेक राष्ट्रभक्त व्यथित होते.
मनातली व्यथा अटलजींनी प्रकट केली
मनुके पुत्रोंके शोणितसे, रंजित है वसुधा की छाती!
टुकडे टुकडे हुई विभाजित बलिदानी
पुरखों की थाती।
कणकणपर शोणित
बिखरा है, पगपगपर माथे की रोली।
इधर मनी सुखकी दीवाली और
उधर जन जन की होली।।
विभाजनाची होती व्यथा.
अटलजी म्हणजे शालिनता. सभेतले अटलजी वेगळे. संसदेतील वेगळे. संसदेच्या मर्यादा त्यांनी कधीच ओलांडल्या नाहीत. बोलताना त्यांचा कधीही तोल गेला नाही. अटलजींचा हजरजबाबीपणा लोकसभेत सर्वांनी अनुभवला आहे. पाकिस्तानातील आमदार, खासदार सभासदानीही त्यांना टाळी दिली आहे. परराष्ट्र नितीचा एक प्रयोग म्हणून पंतप्रधान असताना त्यानी भारत-लाहोर बससेवा सुरू केली. प्रथम प्रवासात ते स्वतः बसमधून गेले. पाकिस्तानातील आमदार, खासदारानी त्यांची सभा व प्रश्नोत्तरे आयोजित केली होती. प्रश्नोत्तराचे वेळी एक महिला पत्रकारांनी त्यांना विचारले, ‘अटलजी तुम्ही अविवाहित असं ऐकलंय खरं आहे का?’ अटलजी म्हणाले ‘हो’, मग माझ्याशी विवाह कराल काय? व पुढे म्हणाली मला भेट म्हणून तुमच्याकडून काश्मिर पाहिजे, अटलजी म्हणाले मी लग्न करीन परंतु दहेज म्हणून पाकिस्तान पाहिजे.’ सारा हॉल हास्य व टाळय़ांनी दुमदुमला होता.
परराष्ट्र धोरण हा अटलजींचा आवडता विषय. खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांचे पहिले भाषण परराष्ट्र धोरणावर झाले. ते इतके प्रभावी होते की, चर्चेला उत्तर देताना पं.नेहरु म्हणाले, ‘बोलण्यासाठी वाणी हवी. पण गप्प बसण्यासाठी वाणी व विवेक पाहिजे तो या नव्या खासदारात आहे. अटलजींच्या जीवनातील अत्यंत कठीण परिक्षेचा क्षण म्हणजे कारगिल युद्ध. त्यावेळी देशात काम चलाऊ सरकार होते. निवडणूका अगदी जवळ आल्या होत्या. आणि ही वेळ साधूनच आक्रमण झाले. अटलजींच्या रण कौशल्याने, सैन्य प्रमुखांना विश्वासात घेऊन दैदिप्यमान असा कारगिल युद्धात जय मिळवला. सेनापतींचं मार्गदर्शन, सैनिकांच्या राष्ट्रभक्तीने मोहिम फत्ते झाली. तो विजय देशाचा विजय होता. कारगिल युद्ध थांबवून समझोता व्हावा अशी अमेरिका व पाकिस्तानची रचना होती. अमेरिकन अध्यक्षांनी अटलजींना चर्चेसाठी आमंत्रण दिले. अमेरिकेला सध्याच्या परिस्थितीत येऊ शकत नाही, असं ठणकावून सांगणारा जगातील एकमेव नेता म्हणजे अटलजी. 370 कलम हे काश्मीरलाच मागासलेपण ठेवणारे आहे. जातियता वाढविणारे आहे व ते जम्मू-काश्मीर व शेष भारतामध्ये एक दरी निर्माण करणारे आहे, असे लोकसभेत दि 28 नोव्हेंबर 1963 रोजी सांगितले होते. अटलजींचा शब्द व आग्रहपूर्ण करणारा नेता तीस वर्षांनी भारताला लाभला.
अटलजी सावरकर भक्त होते. ‘सागरा प्राण तळमळला’ हे काव्य त्यांनी हिंदीत अनुवादित-काव्यात-केले होते. अटलजी कोण होते? त्याचं उत्तर त्यानीच दिलं आहे.
हिंदु तन-मन-हिंदु जीवन
रग रग हिंदू मेरा परिचय
निसर्ग चक्राला कुणीही बदलू शकत नाही. ‘जीवा सवे जन्मे मृत्यू’ हे त्रिकाला बाधीत सत्य. अटलजी आपलं दुःख सदैव मांडत असत. 370 कलम असो वा राम मंदिर असो. 370 कलम भारताच्या अखंडतेच्या दृष्टीनं घातक आहे. तर राममंदिर हे भारतीयांचं श्रद्धा केंद्र आहे, असे सांगत असत. त्यांच्या अपुऱया इच्छा त्यांच्या अनुयानी पूर्ण केल्या. देशाच्या फाळणीसंदर्भात अटलजी अत्यंत दुःखी होते. त्यांच काव्य त्याची साक्ष.
‘किस बेटेने माँ के टुकडे करके दीप जलाए? असा प्रश्न विचारत. 370 कलम व राममंदिर ही इच्छा पूर्ण झाली. अखंड भारताचा ध्यास पूर्ण होईल का? भारत मातेची कूस वांझ नाही. तिच्या पोटी शिवराय जन्माला येतात. फक्त गरज आहे शिवरायाला जन्म देणाऱया मातेची. कारण आपल्या घरात शिवाजी जन्माला येणं म्हणजे संकटाला आमंत्रण. अशी जिजाऊ भारतात नक्की असणार. समर्थ रामदासांनी ‘मरावे परि किर्तिरुपे उरावे’ असे म्हटले आहे. अटलजींनी जगाचा निरोप घेतला. परंतु येणाऱया पिढय़ांना मार्गदर्शक म्हणून ते निश्चितपणे ओळखले जातील.
ऐसा नेता मिळे आम्हाला
काय असे मग उणे?
-शारदाचरण कुलकर्णी