पणजी :
गोव्याची शान म्हणून आाsळखल्या जाणाऱया मांडवीवरील अटल सेतूचा मेरशीच्या बाजूने असलेला काही भाग खचला आहे. मातीच्या भरावावर केलेले बांधकाम खचले आहे. त्यामुळे पुलाचा हा जोडभाग वाहनासाठी बंद करण्यात आला आहे. मात्र अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीतच पुलाचा हा भाग खचल्याने गोव्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
या संदर्भात राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे अधिकारी संदीप चोडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता केवळ मातीचा भागातील बांधकाम तेवढेच खचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पायलिंग करून बांधकाम केलेल्या भागावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेरशी जक्शनपासून फोंडा, मडगाव भागातून येणारी वाहने या पुलावरून थेट पर्वरीपर्यंत व पुढे जात होती. काही दिवसाअगोदर पुलाच्या सुमारे 100 मीटर अंतरापर्यंतचा भाग काही प्रमाणात खचला. या पुलावरून अवजड वाहने जात असल्याने हा भाग अधिक खचण्याची शक्यता होती. त्याचबरोबर त्वरित दुरुस्ती काम हाती घ्यावे, यादृष्टीने सध्या पुलाच्या या भागातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. साधारणपणे मे अखेरपर्यंत या भागातील वाहतूक बंद रहाणार आहे.
पुलाचा भाग खचल्याने चर्चेला उधाण
सुमारे वर्षभराअगोदर या अटलसेतूचे उद्घाटन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न सत्यात उतरविण्याच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांच्या उपस्थित झाले. मात्र अवघ्या कालावधीत हा भाग खचल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे. या अगोदर गवंडाळी येथील पुलही उद्घाटनानंतर अशाच प्रकारे सुमारे महिनाभर बंद ठेवण्यात आला होता.