मातीच्या भरावामुळे बांधकाम खचले : चोडणेकर
प्रतिनिधी / पणजी
गोव्याची शान म्हणून आाsळखल्या जाणाऱया मांडवीवरील अटल सेतूचा मेरशीच्या बाजूने असलेला काही भाग खचला आहे. मातीच्या भरावावर केलेले बांधकाम खचले आहे. त्यामुळे पुलाचा हा जोडभाग वाहनासाठी बंद करण्यात आला आहे. मात्र अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीतच पुलाचा हा भाग खचल्याने गोव्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
या संदर्भात राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे अधिकारी संदीप चोडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता केवळ मातीचा भागातील बांधकाम तेवढेच खचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पायलिंग करून बांधकाम केलेल्या भागावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेरशी जक्शनपासून फोंडा, मडगाव भागातून येणारी वाहने या पुलावरून थेट पर्वरीपर्यंत व पुढे जात होती. काही दिवसाअगोदर पुलाच्या सुमारे 100 मीटर अंतरापर्यंतचा भाग काही प्रमाणात खचला. या पुलावरून अवजड वाहने जात असल्याने हा भाग अधिक खचण्याची शक्यता होती. त्याचबरोबर त्वरित दुरुस्ती काम हाती घ्यावे, यादृष्टीने सध्या पुलाच्या या भागातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. साधारणपणे मे अखेरपर्यंत या भागातील वाहतूक बंद रहाणार आहे.
पुलाचा भाग खचल्याने चर्चेला उधाण
सुमारे वर्षभराअगोदर या अटलसेतूचे उद्घाटन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न सत्यात उतरविण्याच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांच्या उपस्थित झाले. मात्र अवघ्या कालावधीत हा भाग खचल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे. या अगोदर गवंडाळी येथील पुलही उद्घाटनानंतर अशाच प्रकारे सुमारे महिनाभर बंद ठेवण्यात आला होता.
मे अखेरपर्यंत पुल खुला होणार
पुलाचा खचलेला भाग बंद ठेवून सध्या या भागाचे काम हाती घेण्यात आले आहे. खचलेल्या भागातील सुमारे मीटरभर अंतरातील काँक्रीट फोडून काढण्यात आले आहे. आता नव्याने तिथे काँक्रीट भरण्यात येणार आहे. साधारणपणे मे अखेरपर्यंत हे काम चालणार आहे. त्यानंतर वाहतुकीसाठी हा भाग खुला केला जाणार आहे. 450 कोटीपेक्षा जास्त खर्च या पुलावर करण्यात आला आहे. अवघ्या काळात ही स्थिती निर्माण झाल्याने लोकांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची चर्चा आहे.
मातीच्या भरावाचे बांधकाम खचले : चोडणेकर
अटलसेतूच्या जोडरस्त्यापासून काही मीटरपर्यंतचे काम हे मातीचा भराव टाकून करण्यात आले आहे. सर्वच पुलांच्या बाबतीत अशाच पद्धतीने काम करावे लागते. मातीच्या भरावाचा हा भाग काही प्रमाणात खचला आहे. मात्र पायलिंग केलेल्या भागातील बांधकामाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. सध्या या भागाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले असून मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे अधिकारी संदीप चोडणेकर यांनी सांगितले.
कंत्राटदार कंपनीने खचलेल्या भागातील दुरुस्ती काम हाती घेतले आहे. पाच वर्षे पर्यंतच्या काळात देखभालीची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे. मात्र या मध्ये कंपनीलाही दोष देता येत नाही. कारण मातीचा भराव टाकून केलेले बांधकाम खचण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी पुलाच्या बाबतीत असे प्रकार घडले आहेत. झुवारी पुलाच्या बाबतीत तर मोठा प्रकार झाला होता. एका बाजूने 10 मीटर मातीचा भराव टाकण्यात आला होता. मात्र भराव घातल्यानंतर दुसऱयाच दिवशी ही माती वाहून गेली. त्यामुळे झुवारी नदीत एक बेट तयार झाले होते. अटल सेतुचा थोडा भाग जो मातीचा भराव टाकून उभारला होता तो थोडा खचला आहे. आता या वरील काँक्रीटचा भाग फोडून तो पुन्हा भरला जाणार आहे. मात्र यामुळे पुलाला कोणताही धोका नसल्याचेही चोडणेकर यांनी सांगितले.