पर्यटनालाही मिळणार चालना : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
रोहतांग / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशसह संपूर्ण देशवासिय गेल्या कित्येक वर्षांपासून जगातील सर्वात मोठय़ा बोगद्याची वाट पाहत होते तो रोहतांगमधील ‘अटल बोगदा’ अखेर पूर्ण झाला आहे. हा बोगदा हिमाचल आणि लेह-लडाखला जोडणारा असल्यामुळे याचा फायदा येथील जनतेसह भारतीय सैन्यालाही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी या बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. ‘आज केवळ अटलजींचे नाही तर हिमाचल प्रदेशातील करोडो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील अंतर 3-4 तासांनी कमी होईल’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर खोदण्यात आलेला हा बोगदा 9.02 किमी. लांबीचा असून भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक 10,040 फूट उंचीवर बनवण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला दिले गेले आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किमीने कमी होणार आहे. रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी 3 जून 2000 रोजी केली होती. हा बोगदा आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे.
सद्यस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावणार
हा अटल टनल बोगदा लेह-लडाख सीमेवर तणावग्रस्त परिस्थितीत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. ज्यामुळे भारतीय सैन्याला अगदी सहजगत्या सामान, हत्यारांची ने-आण करता येईल. तसेच पर्यटनासाठी आणि दळणवळणासाठी देखील हा बोगदा महत्त्वाची भूमिका बजावेल. महत्त्वाचे म्हणजे भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.
भाजप सरकारकडून कामाला गती : मोदी
अटल बोगदा हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. मात्र सुरुवातीच्या काळात त्यामध्ये अनेक अडचणी आल्या. यावेळी लडाखमधील दौलत बेग ओल्डी रुपातील महत्त्वपूर्ण एयर स्ट्रिप 40-45 वर्ष बंद राहिले. त्यावेळी नक्की काय दबाव होता याबद्दल विस्तारात न गेलेलेच बरे, असे या बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच अटल बोगदा बनविण्याच्या कामाला 2014 नंतर चांगलाच वेग आला. ज्याचा परिणाम आधी दरवषी 300 मीटर सुरंग बनवली जात होती ज्याचा वेग वाढवून वर्षाला 1,400 मीटर बनवली जाऊ लागली. ज्याचा परिणाम 26 वर्षांचे हे काम केवळ 6 वर्षात पूर्ण झाले, असेही त्यांनी पुढे सांगितले.
…तर 2040 पर्यंत प्रतीक्षा!
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2014 पर्यंत या बोगद्याचे काम ज्या वेगाने सुरू होते तसेच पुढे सुरू राहिले असते तर हा बोगदा 2040 मध्ये पूर्ण झाला असता. याचाच अर्थ तुमचे आज जे वय आहे त्यात 20 वर्ष आणखी जोडा. तेव्हा जाऊन लोकांना हा दिवस पाहायला मिळाला असता. अटल बोगद्याबरोबरच बिहारमधील कोसी महासेतूचे कामदेखील आम्ही 2014 मध्ये तेजीने सुरू केले. ज्याचा परिणाम काही दिवसांपूर्वीच या कोसी सेतूचा लोकार्पण सोहळा पार पडला, याचा दाखलाही मोदींनी दिला.