अध्याय नववा
भगवंतांनी यादव कुळाचा नाश करून कृष्णावतार संपवण्याचा निर्णय घेतल्यावर उद्धव अत्यंत दुःखी झाला. कारण देवांच्या सहवासाला तो अंतरणार होता. मला तुमच्याबरोबर घेऊन चला म्हणून त्याने देवांच्या मागे लकडा लावला पण प्रत्यक्षात ते शक्मय नव्हते. कारण भगवंताच्या धामाला पोहोचण्यासाठी विशिष्ट अशा पात्रतेची गरज असते ती पात्रता उद्धवाने अंगी बाणवावी म्हणून भगवंतांनी त्याला उपदेश करायला सुरुवात केली. तो ‘उद्धव गीता’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचाच आपण संक्षेपाने अभ्यास करत आहोत. श्रीकृष्णांच्या कुळात पूर्वी यदु म्हणून एक महान राजा होऊन गेला. त्यांची एकदा अवधुतांशी गाठ पडते. हे एवढे शांतचित्त समाधानी कसे असा प्रश्न यदुराजांना पडतो. त्यावर उत्तर म्हणून अवधूत सांगतात की, गुरुशिवाय आत्मविद्या येत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी जवळपास सर्व जगाला गुरु केले आहे. कारण जो सद्गुणी आहे तो तर गुरु आहेच, पण जो दुर्गुणी आहे त्याचा दुर्गुण आपल्यात येऊ नये म्हणून त्यालाही त्यांनी गुरु केले. त्यांचे प्रमुख असे चोवीस गुरु आहेत. त्यापैकी सतरा गुरुंची माहिती आपण सातव्या आणि आठव्या अध्यायात घेतली. आता पुढील गुरु अभ्यासूया.
अवधूत राजाला म्हणाले, ‘मी पुढे टिटवीला गुरु मानले. का ते ऐक. या पक्षाला एकदा चांगला मांसाचा तुकडा मिळाला. तो लगेच खाऊन टाकायचे सोडून लोभाने त्याने तो जवळ बाळगला. म्हणजे एकप्रकारे त्याने त्याचा संग्रह केल्यासारखेच झाले. आपण मागील अध्यायात बघितले की घरमाशी कसलाही संग्रह करत नाही म्हणून ती सुखी असते तर मधमाशी मधाचा संग्रह करते आणि तो संग्रहच तिच्या घाताला कारणीभूत ठरतो. इथेही तेच झाले टिटव्याने मिळालेला मांसाचा तुकडा लगेच खाऊन न टाकता लोभाने जवळ ठेवला पण इतका मोठा मांसाचा तुकडा पाहून इतर पक्षी त्याचा पाठलाग करू लागले. आता ते आपल्यावर हल्ला करतील असा विचार करून हा पुढे पुढे पळू लागला. पण शेवटी सर्वांनी मिळून त्याला घेरलेच. त्या मांसाच्या तुकडय़ासाठी सर्वांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला हैराण करून सोडले. तोंडात मांसाचा तुकडा असल्याने तो चोचीने इतरांवर हल्ला पण करू शकत नव्हता. तेव्हा त्याने विचार केला की, हा मांसाचा तुकडाच माझ्या दुःखास कारणीभूत आहे. म्हणून त्याने तो तुकडा चोचीतून टाकून दिला. त्यामुळे इतर पक्ष्यांनी त्याला त्रास द्यायचे बंद केले. पण जेथे तो मांसाचा तुकडा पडला होता तेथे मोठे भांडण सुरू झाले. जमलेले पक्षी एकमेकांची डोकी फोडून एकमेकांची तोंडे ठेचू लागले. यावरून हे लक्षात घ्यायचे की संग्रह हा दुःखास कारणीभूत होतो व त्याग सुखाची प्राप्ती करून देतो. राजा नीट ऐक, माडय़ा, गोपुरे, वाडे, धन, धान्य, परोपरीची वस्त्रे, रत्ने, पोवळी, द्रव्य, बायकामुले, इत्यादि समुदाय हाच खरा संग्रह होय. या साऱया संग्रहाचे मूळ पहावयास गेले तर केवळ देहबुद्धी, मी म्हणजेच देह अशी भावना, तीही अभिमानाने पोसलेली. त्यामुळे मी कर्ता आहे हा विचार अभिमानामुळे दृढ होतो म्हणजे एकंदरीत सर्वांचे मूळ अभिमान. तो जेव्हा सोडून द्यावा, तेव्हाच प्रपंचाचे मूळ खुंटते. मूळच तोडून टाकले म्हणजे प्रचंड वृक्षही उलथून पडतो, तसेच हे आहे. देहबुद्धी आणि अभिमान ही परस्पर साहाय्यकारी असून परस्परांना ती चिकटून राहतात. पण हा अभिमान सहजासहजी माणसाला सोडत नाही. जमिनीत जशी हरळी फोफावते तसा अभिमान देहाला ग्रासून टाकतो. शेतातील इतर तण एकदा काढले की भागते पण हरळी एकदा काढून भागत नाही तर वारंवार ती मुळासकट उपटून काढावी लागते. योग्याने अभिमानाची आणि हरळीची केलेली तुलना नेहमी लक्षात ठेवावी व त्यापासून चार हात दूर रहावे. अभिमान व देहबुद्धी यांचा त्याग केला असता मोठे सुख होते. हे दोन्ही गेल्याशिवाय त्याग करावयाला गेले तर देहबुद्धी डोके वर काढते व त्याग करतो म्हणणाऱयाची विटंबना होते. अभिमानासहित सर्व सोडावे, तेव्हाच सुखाच्या पायघडय़ा पडतील. हे राजा! आता अभिमान सोडून कसे वागता येईल असे म्हणशील, तर त्यासाठी मी बालकाला गुरु केले. त्याविषयी साद्यंत लक्षण तुला सांगतो. (अध्याय आठवा समाप्त)