दिवाळीपर्यंत गरिबांना धान्यही विनामूल्य, पंतप्रधान मोदी यांच्या महत्वपूर्ण घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना 21 जूनपासून कोरोना लस विनामूल्य दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरणाचा संपूर्ण कार्यक्रम स्वतःच्या हाती घेतला असून त्याअंतर्गत राज्यांना लसींचा पुरवठा विनामूल्य केला जाणार आहे. त्याचप्रमाणे येत्या दिवाळीपर्यंत देशातील 80 कोटी गरिबांना ठराविक प्रमाणात विनामूल्य धान्यपुरवठाही केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केली आहे.
सोमवारी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केंद्र सरकारची पुढील वाटचाल स्पष्ट केली. त्यानुसार लस खरेदी आणि वितरण केंद्र सरकारने पूर्णतः आपल्या हातात घेतले आहे. केंद्राकडून सर्व राज्यांना विनामूल्य लसपुरवठा केला जाणार आहे. राज्यांनी त्यांना मिळालेल्या लसी त्यांच्या नागरिकांना टोचण्याचे उत्तरदायित्व घ्यावयाचे आहे. केंद्रशासित प्रदेशांनाही हेच नियम आहेत, अशी दिलासादायी घोषणा पंतप्रधानांनी केली.
खासगी रुग्णालयांनाही…
केंद्र सरकारने मिळविलेल्या एकंदर लसींपैकी 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना आणि लसीकरण केंद्रांना विशिष्ट किमतीत दिल्या जाणार आहेत. खासगी रुग्णालयांनी लोकांना लस ठरलेल्या किमतीतच द्यायची असून टोचण्याचे व इतर सेवा शुल्क 150 रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये, असा दंडक आहे. खासगी रुग्णालयांनाही लसी केंद्र सरकारच देणार आहे.
विनामूल्य धान्याला कालावधीवाढ
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकानंतर गरिबांच्या लाभासाठी केंद्र सरकारने महिन्याला विशिष्ट प्रमाणात धान्य विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला होता. आता ही योजना येत्या दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे. तिचा लाभ देशातील 80 कोटी लोकांना होईल, अशी माहिती देण्यात आली. सध्याच्या आव्हानात्मक काळात सरकार गरिबांच्या सोबत आहे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
डिसेंबरपर्यंत 133 कोटी लसी
जून अखेरीपर्यंत भारताला 12 कोटी आणखी लसींच्या मात्रा (डोस) मिळणार आहेत. तसेच येत्या डिसेंबरअखेरीपर्यंत 133 कोटी मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. लसीकरणाची सोमवारची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी ही सर्व सज्जता पूर्ण झाल्यानंतरच केली आहे. भारतातील 7 कंपन्या लसी बनविण्याचे काम करीत असून कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डशिवाय आणखी तीन लसी निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहेत, असेही सांगण्यात आले.
महत्वाचे आवाहन…
भारताचा कोरोनाशी संग्राम अद्याप सुरूच आहे. रुग्णसंख्या घटत असली तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे कोणीही बेसावधपणा, अतिउत्साह किंवा ढिलाई दाखवू नये. मास्कचा उपयोग, सामाजिक अंतर राखणे इत्यादी नियमांचे कसोशीने पालन ल्नॉकडाऊन असताना अगर नसताना करणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर जाणे किंवा कोणत्याही निमित्ताने गर्दी करणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे, असे महत्वाचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले आहे.
उशीर केला
सरकारने हे कार्यक्रम घोषित करण्यास बराच विलंब केला. हा सरकारचा राजकीय स्टंट आहे. सरकारला परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे, अशी टीका काँगेसने केली. तर विनामूल्य लसीकरण आणि धान्यवितरणामुळे कोरोनाविरुद्धच्या संग्रामाची धार वाढणार असल्याची भलावण केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केली आहे.
आणखी कोणत्या घोषणा…
लसीकरणासंबंधी
राज्यांना स्वतंत्ररित्या लस खरेदीची मुभा नाही
लस केंद्रच मिळविणार आणि राज्यांना देणार
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस विनामूल्य
खासगी केंद्राना केंद्र सरकारकडूनच सशुल्क लस
खासगी केंद्रातील लसीची किंमत केंद्रच ठरविणार
गरीब कल्याण योजना
गरिबांना विनामूल्य धान्य योजनेला दिली कालावधीवाढ
दिवाळीपर्यंत 80 कोटी गरिबांना विनामूल्य धान्य देणार
इतर माहिती
तीन कोरोना प्रतिबंधक लसी निर्मितीच्या अंतिम टप्यात
नाकाने घेण्याच्या लसीचे परीक्षण पोहचले पुढच्या टप्प्यात ड एका वर्षात स्वदेशी लस ः भारतीय संशोधकांचा पराक्रम