यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी व शेवटची वनडे आज : उरलीसुरली पत राखण्यासाठी मैदानात उतरणार
कॅनबेरा / वृत्तसंस्था
फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर सपशेल लोटांगण घालणाऱया भारतीय क्रिकेट संघासमोर आज तिसऱया व शेवटच्या वनडे लढतीत केवळ उरलीसुरली पतप्रतिष्ठा राखण्यासाठीच मैदानात उतरावे लागेल. पहिल्या दोन पराभवाच्या सावटातून बाहेर येणे, हे भारतीय संघासमोर येथील मुख्य आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी लढतीला सुरुवात होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी नेटवर्कवरुन केले जाणार आहे.
मालिकेत क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी भारताचे प्रयत्न असतील. पण, यात यश मिळाले नाही तर या वर्षातील भारताचा हा सलग दुसरा मालिका पराभव ठरेल. यापूर्वी, या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात भारताचा न्यूझीलंडने एकतर्फी फडशा पाडला होता.
‘पुढील सामन्यात पूर्ण ताकदीने मैदानात उतरत प्रतिस्पर्ध्यांचे क्लीन स्वीपचे मनसुबे उधळून लावणे हे आमचे पहिले लक्ष्य असेल’, असे आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यरने नमूद केले. ‘आमचे गोलंदाज आणखी पर्याय आजमावून पाहत आहेत आणि ते नव्या रणनीतीसह ते तिसऱया व शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करतील’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
यापूर्वी, या मालिकेतील पहिल्या दोन्ही लढतीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा अगदी यथेच्छ समाचार घेतला आणि दुसरीकडे, भारतीय फलंदाज मात्र त्या तोडीने तुटून पडू शकले नाहीत. दोन्ही लढतीत भारताचा पराभव किती धावांच्या फरकाने हा मुद्दा गौण आहे. मात्र, जी तडफ भारतीय फलंदाजीत अपेक्षित होती, त्याची प्रचिती आली नाही, ही संघव्यवस्थापनासाठी अधिक चिंतेची बाब आहे. दस्तुरखुद्द विराट कोहलीने आपण सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरलो, याची जाहीर कबुली यापूर्वी दिली आहे.
अन्य गोलंदाजांप्रमाणे जलद गोलंदाज नवदीप सैनी देखील पूर्ण निष्प्रभ ठरला आणि पुढे विराटवर पूर्ण तंदुरुस्त नसलेल्या हार्दिक पंडय़ाकडून व अगदी मयांक अगरवालकडून देखील सैनीची उरलेली षटके पूर्ण करुन घेण्याची वेळ आली. सैनीने त्या सामन्यात 7 षटकात 70 धावांची खैरात केली.
त्या पार्श्वभूमीवर सैनीला संघातून वगळले जाणे जवळपास निश्चित मानले जाते. त्याच्याऐवजी 27 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या शार्दुल ठाकुरला खेळवले जाणार की यॉर्कर सम्राट थंगसरु नटराजनला तैनात केले जाणार, याची आज उत्सुकता असेल. नटराजनला संधी दिल्यास त्याच्यासाठी ही पदार्पणाची वेळ असेल आणि टी-20 मालिकेपूर्वी त्याची येथे पूर्वतयारीही होऊ शकेल. नटराजनचे टी-20 मालिकेत खेळणे निश्चित आहे. नटराजन यॉर्कर, कटर, स्विंग यांचा उत्तम मिलाफ साधू शकतो. त्यामुळे, त्याच्या गोलंदाजीत अधिक वैविध्य रहात आले आहे.
लागोपाठ शतके झळकावणारा स्टीव्ह स्मिथ, अचानक बहरात आलेला मॅक्सवेल, ऍरॉन फिंच यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली असून त्या पार्श्वभूमीवर, नटराजनची या अव्वल फलंदाजांशी जुगलबंदी रंगणार का, हे देखील पहावे लागेल. बुमराहसारख्या मुख्य गोलंदाजाला केवळ दोन षटकांचा पहिला स्पेल दिल्याने विराटला बरीच टीका ओढवून घ्यावी लागली असून गंभीरपाठोपाठ आशिष नेहराने देखील या निर्णयावर आसूड ओढले आहेत.
फिरकीपटूंचीही धुलाई
भारताच्या मध्यम-वेगवान नव्हे तर अगदी फिरकी गोलंदाजांची देखील बरीच धुलाई झाली आहे आणि यामुळे विराट कोहलीसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. फिरकी गोलंदाजात यजुवेंद्र चहल सर्वात महागडा ठरला आहे. त्याने दोन सामन्यातील 19 षटकात 160 धावांची खैरात लुटू दिली असून केवळ एकच गडी बाद केला आहे. दुसरीकडे, रविंद्र जडेजाने 6.15 ची इकॉनॉमी नोंदवली असली तरी दोन्ही सामन्यात तो एकही बळी घेऊ शकलेला नाही. दुसऱया सामन्यात फलंदाजीत कोहली व राहुल बहरात दिसून आले. पण, केएल राहुलला स्ट्राईक रोटेट करता आला नाही, याचा फटका सासावा लागला. अर्थात, पहिल्या दोन्ही लढतीत भारताची कामगिरी पाहता, विराटसेना 335 ते 340 पर्यंत धावांचा यशस्वी पाठलाग करु शकेल, ही सकारात्मक बाब सलग दोन वेळा अधोरेखित झाली आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, मयांक अगरवाल, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, टी. नटराजन.
ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), डॅर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हॅझलवूड, सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, कॅमेरुन ग्रीन, मोईसेस हेन्रिक्यूज, ऍन्डय़्रू टाय, डॅनिएल सॅम्स, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक).
सामन्याची वेळ : सकाळी 9.10 पासून.
थेट प्रक्षेपण : सोनी नेटवर्क