बाबरी खटलाप्रश्नी पाच तास नोंदवली साक्ष
लखनौ / वृत्तसंस्था
बाबरी मशीद पाडाव खटला सुनावणीवेळी शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात भाजपचे नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची साक्ष नोंदवण्यात आली. जवळपास पाच तास त्यांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी त्यांना तब्बल शंभरहून अधिक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या जबानीवेळी त्यांनी आपल्यावरील आरोप निराधार असून आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. अडवाणी यांच्यापूर्वी गुरुवारी भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांची साक्ष नोंदविण्यात आली होती.
बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी 32 जणांची साक्ष फौजदारी प्रक्रिया संहिता कलम-313 अंतर्गत नोंदविण्यात येत आहे. विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. जोशी यांच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी शुक्रवारी यासंदर्भात आपली साक्ष नोंदवली. सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत झालेल्या सुनावणीत त्यांना सुमारे 100 प्रश्न विचारले. बहुतेक प्रश्नांच्या उत्तरात अडवाणी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारने नाहक आपल्याला गुंतवल्याचा दावा केला.
बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी भाजप नेत्या उमा भारती आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी याप्रकरणी यापूर्वीच साक्ष दिली आहे. सध्या विशेष न्यायालयात या खटल्याची दररोज सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 ऑगस्टपर्यंत या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.