वृत्तसंस्था /अयोध्या :
अयोध्येत वादग्रस्त इमारत पाडविण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी न्यायालय निवाडा करणार आहे. या पार्श्वभूमीवर बाबरी मशदी प्रकरणातील पक्षकार इक्बाल अंसारी यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाला सर्व आरोपींना दोषमुक्त ठरविण्याचे आवाहन केले आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग यांच्यासह सर्व 48 आरोपींना निर्दोष ठरवत हे पूर्ण प्रकरण समाप्त करण्याची विनंती अंसारी यांनी केली आहे.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील अनेक आरोपींचा मृत्यू झाला आहे. जे हयात आहेत, ते आता वृद्ध झाले आहेत. या सर्वांवरील आरोप मागे घेत पूर्ण प्रकरणच निकाली काढले जावे अशी माझी इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तसेही कुठलाच वाद शिल्लक नसल्याचे अंसारी यांनी म्हटले आहे. 28 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साक्षी महाराज, साध्वी ऋतुंभरा, विहिंप नेते चंपत राय यांच्यासह 32 जण आरोपी आहेत.
वाद संपुष्टात
हाशिम अंसारी यांचे पुत्र इक्बाल यांनी देशाचा सामाजिक बंध बळकट करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांना परस्परांसोबत सौहार्दाने राहण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक वर्षांपासून चालत आलेल्या वादाचा अंत झाला आहे आणि आता राम मंदिर उभारणीस प्रारंभ देखील झाला असल्याचे इक्बाल म्हणाले. अयोध्येत वादग्रस्त इमारत पाडविल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्ष ऐकून घेतल्यावर 1 सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली आहे.