प्रतिनिधी/ कराड
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कराड शहराच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी वैशिष्टय़पूर्ण अनुदानातून आणला होता. यातील अडीच कोटी रूपयांचा निधी शासनाचा आदेश डावलून दोन नगरसेवकांच्या 2 कामांसाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे 14 जुलैच्या विशेष सभेतील विषय क्रमांक 17 हा कलम 308 खाली रद्द करावा, अशी तक्रार पालिकेतील भाजपचे गटनेते विनायक पावसकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, भाजपचे सरकार असताना विक्रम पावसकर यांनी 5 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यातील 2.50 कोटींचा निधी 28 रस्त्यांसाठी टाकला होता. हे रस्ते पूर्ण झालेले आहेत. उरलेला 2.50 कोटींचा निधी पथदिवे बसवण्यासाठी आणलेला होता. परंतु सरकारने पथदिवे बसवण्यासाठी नवीन अटी घालून योजना अमलात आणल्यामुळे हा निधी 4 जागांचा विकास करण्यासाठी व 6 कामे गावातील ले आऊटमधील विकास करण्यासाठी ठराव करून तो शासनास देऊन त्याला मंजुरी घेतली. यात सोमवार पेठेतील जुन्या मतिमंद शाळेच्या ठिकाणी वाचनालय, अभ्यासिका बांधणे, आरक्षण क्रमांक 25 मध्ये शॉपिंग सेंटर बांधणे, कुंभार पाणवठा येथील दशक्रिया विधी शेड सुशोभीकरण, कृष्ण नाका प्लॉटमध्ये अभ्यासिका बांधणे या कामांसाठी म्हणून 1 कोटी 55 लक्ष रुपये खर्च करावेत व ले आऊटमधील 6 ओपन स्पेस यासाठी 95 लाख रुपये खर्च अपेक्षित केला होता.
साधारण वर्षापूर्वी नगरसेविका स्मिता हुलवान यांच्या वार्ड क्रमांक 11 मधील 2 ओपन प्लॉटमध्ये 2.50 कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे खर्च करण्याचा घाट घातला गेला होता. त्यावेळेला आम्ही आपल्याकडे तक्रार केल्यानंतर सदरचे बेकायदेशीर काम थांबवण्यात आले. 15 जुलै रोजी विशेष सभेमध्ये याबाबतचा विषय क्रमांक 17 हा घाईगडबडीत मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये शनिवार पेठेत कोल्हापूर नाक्याजवळील मोटे हॉस्पिटल नजीक फायनल प्लॉट 468 मधील ओपन स्पेस विकसित करण्यासाठी 33 लक्ष 98 हजार 866 रूपये तसेच शनिवार पेठ फायनल प्लॉट 467 -अ, कल्याणी कॉलनीमधील ओपन स्पेस विकसित करण्यासाठी 2 कोटी 13 लक्ष 81 हजार 142 असे एकूण 2 कोटी 47 लक्ष 80 हजार मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतु महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णयानुसार कुठल्या कामावर किती खर्च करावा याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. हे आदेश डावलून मुख्याधिकाऱयांकडून चुकीचा अहवाल घेऊन व त्यांच्या सहकार्याने कल्याणी कॉलनीमध्ये जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांचा बंगला असल्याने व नगरसेविका स्मिता हुलवान यांचा वार्ड क्रमांक 11 येत असल्याने बेकायदेशीरपणे ठराव करून स्वतःच्या वार्डातील कामे करण्याचा घाट घातला गेला आहे. नगरपरिषदेच्या विकास कामामध्ये अडथळे आणून शहराचा विकास न करता सरकारकडून आलेल्या निधीचा वापर फक्त 2 कामांवर करून स्वतःचा फायदा करून घेण्याचा घाट घातला गेला आहे. यासाठी या ठरावास आमचा विरोध आहे. सबब कलम 308 खाली हा ठराव रद्द करण्यात यावा, अशी तक्रार पावसकर यांनी केली आहे.