कोकण रेल्वे मार्गावर आजपासून लांब पल्ल्याची वाहतूक : सुरक्षित अंतराचे नियम लागू : कन्फर्म तिकीटधारकांनाच टेनमध्ये चढण्याची परवानगी
अजय कांडर / कणकवली:
तब्बल पाचवेळा लॉकडाऊन झाल्यानंतर एकाचवेळी प्रवाशांची सर्वाधिक जलद वाहतूक करणारी रेल्वे सेवा सुरू होत आहे. लॉकडाऊन नंतरच्या या रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. गाडीत आणि रेल्वे फलाटावर प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे नियम लागू करण्यात आले आहेत. प्रतीक्षा यादीतील कन्फर्म तिकीटधारकांनाच रेल्वेत चढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर सुमारे अडिच महिन्यांनी 2 जूनपासून नेत्रावती, मंगला एक्सप्रेस या दोन गाडय़ा धावणार असून या लांब पल्ल्याच्या गाडय़ांपैकी पूर्वीप्रमाणेच नेत्रावती एक्सपेस सिंधुदुर्गात कुडाळ स्थानकावर, तर मंगला एक्सप्रेस कणकवली स्थानकावर थांबणार आहे.
कोरोनाच्या काळात प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी जे उपाय प्राधान्याने आखण्यात आले, त्यात लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच लोकल रेल्वे सेवा आणि कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. या दोन्ही गाडय़ांना सिंधुदुर्गात प्रत्येक गाडीला एक-एक थांबा असल्याने जिल्हय़ातील प्रवाशांना राज्याबाहेर शहरातही प्रवास करायला मिळणार आहे. मात्र, काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी कमी वजनाचे साहित्य सोबत घ्यावे
प्रवाशांनी कमी वजनाचे साहित्य घेऊन प्रवास करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे. गाडय़ा स्थानकात थांबण्यापूर्वी परिसर प्रशासनाकडून वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. गाडय़ांचेही निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात केवळ ‘कन्फर्म’ तिकीट असणाऱया प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्र्रवेश देण्यात येणार आहे. अन्य प्रकारचे तिकीट असणाऱयांना प्रवास करता येणार नसल्याने रेल्वे प्रवास करतानाही प्रवाशांना तिकीट ‘कन्फर्म’ होईपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. ‘आरएसी’ आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल, परंतु प्रतीक्षा यादीतील तिकीटधारकांना टेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग होणार
गाडीत चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे थर्मल क्रिनिंग होणार असून रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करता येणार आहे. गाडीत चढताना आणि प्र्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी चेहऱयावर मास्क वापरणे गरजेचे आहे. स्थानकावर थर्मल क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवाशांनी कमीत कमी 90 मिनिटे अगोदर स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. प्रवाशांनी स्थानक आणि रेल्वेमध्ये सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे. रेल्वेच्या वातानुकूलित कोचेसमध्ये मिळणारे अंथरुण, पांघरुण येत्या काळात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे प्रवाशांना स्वतःचे पांघरुण आणावे लागणार आहे. काही कोचेसमधील पडदेही काढण्यात येणार आहेत.
सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी स्थानकाच्या आवारात बॅरिकेडींग केले जाणार आहे. जेणेकरून प्रवाशांची गर्दी होऊ नये आणि शारीरिक अंतर राखले जावे. विशि÷ अंतर ठेवून चौकोनांचीही आखणी केली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने वृद्धांनी प्र्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. कोरोना कमी होई&पर्यंत सर्वांना सार्वजनिक शिस्तीचे पालन करावे लागणार आहे. स्थानकाच्या आवारात शारीरिक अंतर राखण्यात येणार आहे. निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येईल. रेल्वेने जाहीर केलेली नियमावलीची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जेथे बोर्डिंग तेथून प्रवासास प्रारंभ
ज्या रेल्वे स्टेशनपासून प्रवाशाचे कन्फर्म तिकीट असेल तेथूनच प्रवाशांना प्रवास करता येणार असल्याने जेथे बोर्डिंग असेल, त्याच स्टेशनवरून रेल्वेच्या प्रवासास प्रारंभ करावा अन्य स्टेशनवर रेल्वेत बसू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.